31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeलेखकांदा दरवर्षी का करतो वांधा?

कांदा दरवर्षी का करतो वांधा?

कांदा हा आपल्याला जेवण बनवायला आणि अन्य बाबीसाठी आवश्यक असतो. असे असताना केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिडले आहेत. राज्यात मंगळवारी पुणे, नाशिक आदीसह ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करून आपला निषेध नोंदवला. तसेच 4 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळायलाच हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. कांदा नक्की आला कुठून? त्याचे भारतात महत्व काय, अशा सगळ्या बाबी यांचा विचार करून इतिहास अभासक सरला भिरुड यांनी लिहिलेला लेख आमच्या वाचकांसाठी…
—————————————————–

सकाळ झाली की खसाखसा कांदा कापून पिठले-भाकरी नाही तर कांदेपोहे, उपमा ही नाश्त्याला बनवले जाते, मुलगी बघायचा कार्यक्रम तर कांदेपोहे यांशिवाय पुर्णच होत नाही, चिकनमटन रस्सा आणि कांदे , तोंडीलावणे म्हणून कांदा.. भारतीय खाद्यसंस्कृतीचा कांदे हा अविभाज्य घटक कधी झाला? हा मोठाच प्रश्न आहे. ऋषीमुनी कंदमुळे खाऊन जगत असत हे वाचतो, पण त्यात कांदा होता की नाही काही सांगता येत नाही. खाद्यसंस्कृतीचा इतिहास हा नव्याने पुरातत्वीय दृष्टीने मांडण्यात येत आहे आणि मृदभांडीच्या आतल्या बाजूला असलेल्या अवशेषांचे विश्लेषण करून सांगता येते. नुकताच एका संशोधन लेखात आजची जी करी आपण करतो, तशीच करी पाच हजार वर्षांपूर्वी केली जात होती आणि त्यावरून कांदा हा आहाराचा भाग होता हे लक्षात येते.
कांदा एक लोकॅलरी फूड आहे. यात फॅट अगदीच नगण्य असते . मात्र यात भरपूर क जीवनसत्व असतं. १०० द्रॅम कांद्यात ४ मिलीग्रॅम सोडियम, १ मिलीग्रॅम प्रथिनं, ९-१० मिलीग्राम कर्बोदकं आणि ३ मिलीग्राम तंतुमय पदार्थ असतात. यामुळेच कांदा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कांद्यात अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे कर्करोग असणाऱ्यांनाही कांदा खाण्याची गरज असते. प्राचीन इजिप्तमध्ये ५५०० वर्षांपूर्वी, भारत आणि चीनमध्ये ५००० वर्षांपूर्वी , सुमेरियामध्ये ४५०० वर्षांपूर्वी कांद्याची लागवड केली जात होती. सुमारे ३५०० इसवीसन पूर्व काळात कांद्याची लागवड सुरू झाल्यामुळे, त्यांचा वापर करणाऱ्या प्राचीन संस्कृती या महान भाजी, कांदा यावर अवलंबून झाल्या. कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आपल्या ताटात नेमका कधी आणि कसा आला, याचा इतिहास जाणून घेऊ.कांद्याचा वापर मेसोपोटेमियात ४००० वर्षांपुर्वी केला जात असे. हे एका लेखातून स्पष्ट झाले आहे. १९८५ साली एका फ्रेंच पुरातत्ववेत्याने तो वाचल्यावर ही माहिती समजली होती. जगभरातील अनेक देशांमध्ये कांद्याचे पीक घेतले जाते.येल विद्यापिठातील बॅबिलोनिया संग्रहातील एका मृत्तिकापटावर लिहिलेल्या ३ लेखांमधील एक गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांना पाककलेचे जगातील सर्वात जुने पुस्तक मानले जाते.त्यावरील मजकुराचा अर्थ १९८५ साली उलगडला गेला.
मेसोपोटेमियाची संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व याचे अभ्यासक आणि स्वयंपाकाची आवड असणारे ज्यां बोटेरो यांना हा अर्थ उलगडण्याचं श्रेय दिले जाते.या मृत्तिकापटावर अनेक जुन्या आणि वैविध्यपूर्ण पदार्थांची पाककृती असल्याचं त्यांनी सांगितले. त्यावेळेस एक पदार्थ लोकांना जास्तच आवडायचा तो म्हणजे कांदा होय. कांदा वर्गातील भाज्या तेव्हाच्या लोकांना जरा जास्तच आवडायच्या असे बोटेरो सांगतात. मेसोपोटेमियामधले लोक पदार्थांमध्ये कांदा, कांद्याची पात, लहान कांदे आणि लसणाचा वापर करत.
खाद्यपदार्थांचे इतिहासकार आणि ‘द सिल्करोड गुर्मे’च्या लेखिका लॉरा केली सांगतात, “जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर कांदा हा मध्य आशियातून आला असे आम्ही मानतो. अशात मेसोपोटेमियामध्ये त्याचा झालेला वापर पाहाता त्याकाळापर्यंतही कांद्याने भरपूर प्रवास केलेल्याचे दिसते. युरोपात कांस्ययुगात कांद्याचा वापर होत असल्याचे पुरावे सापडले आहेत.”केली सांगतात, “२००० वर्षं आधी रेशीम मार्गावर कांद्याचा वापर होत होता यात शंका नाही. तेव्हापर्यंत मेसोपोटेमियाच्या लोकांनी आपल्या कांद्याच्या पदार्थांचा इतिहास लिहित होते.”मेसोपोटेमियाच्या लोकांच्या पदार्थांची चव घेण्यासाठी केली यांनी त्यांच्या पाककृतीनुसार काही पदार्थ करुन खाऊनही पाहिले.कांद्यावरचं हे प्रेम आज ४००० वर्षं झाली तरी कायम आहे. कांद्याचा उल्लेख नसलेले पाककृतींचे पुस्तक सापडणं कठीणच आहे. जगभरातील एकूण कांद्यापैकी ४५ टक्के कांदा भारत आणि चीनमध्ये पिकवला जातो. परंतु कांदा सर्वाधीक खाणाऱ्या लोकांमध्ये मात्र हे देश नाहीत.
दरवर्षी कांदा हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो कारण इतका स्वस्त विकला जातो. कांदा राजकारण हा वेगळाच संशोधनाचा विषय आहे.
हे सुद्धा वाचा
मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात हडपली दोन कार्यालये!
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंमुळे २ लाख कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प खड्ड्यात, चूक दुरूस्त करण्यासाठी अजितदादांनी आज बोलाविली ‘जम्बो’ बैठक !
फोटो जर्नालिस्ट अतुल कांबळे यांना जागतिक किर्तीचे दोन पुरस्कार

२ हजार ४१० प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तरीही हा खर्च उत्पादन खर्चाशी ताळमेळ साधत नाही.केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार जगातील सुमारे १७५ देश कांदा पिकवतात. गहू पिकवणाऱ्या देशांपेक्षा ही संख्या जवळपास दुप्पट आहे.चीन आणि भारतात एकूण कांद्यापैकी ४५ टक्के कांदा पिकवला जातो. मात्र प्रतिव्यक्ती कांदा खाण्याचं सर्वाधीक प्रमाण लिबियात आहे. २०११ साली संयुक्त राष्ट्राने केलेल्या पाहणीत लिबियातील प्रत्येक व्यक्ती वर्षभरात सरासरी ३३.६ किलो कांदा खाते. लिबियातल्या प्रत्येक पदार्थात कांदा असतो. पश्चिम अफ्रिकेतील अनेक देशांत कांदा भरपूर खाल्ला जातो. मात्र त्यातला कोणताही देश सर्वाधिक कांदा पिकवणाऱ्या पहिल्या १० देशांत नाही. भारतात कांदा हा राजकीय मुद्दा होतो. दिल्लीमध्ये १९९८ साली भाजपाचे सरकार कांद्याच्या किमतीमुळे गेले असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये ख्रिसमसच्या काळात कांद्याची मागणी थोडी वाढते तसेच दिवाळी, ईदच्याकाळातही ती मागणी वाढते. कांद्यात अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे कर्करोग असणाऱ्यांनाही कांदा खाण्याची गरज असते.

-सरला भिरुड,
(लेखिका पुणेस्थित पुरातत्व आणि इतिहास अभ्यासक आहेत. )

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी