मुंबई गोवा महामार्गाच्या नादुरुस्तीच्या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी घेतलेल्या आंदोलनात्मक भूमिकेमुळे आता भाजप मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसैनिकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या एका खुल्या पत्रकात आंदोलणकर्त्या मनसैनिकांवर टीका करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच महामार्गाचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी या पत्रातून दिले आहे.
मनसैनिकांनी आंदोलनाद्वारे केलेल्या तोंडफोडीवर टीका करत रवींद्र चव्हाण म्हणाले, “जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…. ? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक….. ?”
“दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे…. ” असे म्हणत मनसे च्या भूमिकेवर त्यांनी निशाण साधला आहे.
दगड फोडला तर कलाकृती उभी राहते दगड फेकला तर विध्वंस होतो@Dev_Fadnavis @nitin_gadkari @narendramodi #MumbaiGoaHighway#BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र #RavindraChavan #रविंद्र_चव्हाण#PWD #डोंबिवली #डोंबिवलीकर#Dombivli… pic.twitter.com/NKput4ueYz
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) August 22, 2023
मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात ते पुढे म्हणाले की, “मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. ”
रवींद्र चव्हाण यांच्या या खुल्या पत्रा नंतरमनसे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे पदाधिकारी गजानन काळे यांनी चव्हाण यांच्या भूमिकेचा निषेध करत एक पत्र जारी केले आहे.
हे ही वाचा
मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात हडपली दोन कार्यालये!
अखेर देवेंद्र फडणवीस होणार डॉक्टर; जपानच्या कोयासन विद्यापीठाने केली मानद डॉक्टरेटची घोषणा
आपल्या पत्रातून गजानन काळे यांनी म्हंटले आहे की, “रखडलेल्या आणि मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने जमेल तिथे सनदशीर मार्गाने आणि भगत सिंग यांच्या वाक्याप्रमाणे “उंचा सूनने वालो को धमाके की जरुरत होती है ” अशा मनसे स्टाईल ने आंदोलन केली आहेत. त्याचा धसका भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जास्तच घेतल्याचे दिसतय. ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देण्याची मराठी संस्कृती आहे. संत तुकाराम त्यामुळेच म्हणतात “भले तरी देवू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी”
गेली १७ वर्ष रस्ता होत नाही याची लाज वाटण्यापेक्षा आंदोलन करणाऱ्याना शहाणपणाच्या गोष्टी शिकवणाऱ्या मंत्री महोदय यांना काय बोलावे? असे म्हणत गजानन काले यांनी,’ जी तोडफोड झाली त्याची नुकसानभरपाई आणि जबाबदारी आम्ही घेतो आणि मंत्री म्हणून ज्यांचे मृत्यू झाले त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्ही घेणार का ?; असा थेट सवाल केला आहे.
पुढे भाजपवर टीका करत काळे यांनी सांगितले, “सत्तेचे इमले बांधलेल्यानी आमची बरोबरी करू नये. मोडतोड करून पक्ष फोडून आणि भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनाच पक्षात घेवून त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगणारे तुम्ही आणि तुमची नैतिकता केव्हाच गहाण टाकली आहे यांची जनतेलाही कल्पना आहे.”
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मनसैनिकांनी आंदोलन करत अनेक ठिकाणी तोडफोड केली होती.