आई-वडील काबाडकष्ट करायचे, त्यांचे कष्टाचे पांग फेडण्यासाठी त्यांचा मुलगा देखील दिवसरात्र अभ्यास करत होता. अखेर तो दिवस उगवला… आणि सालगडी म्हणून राबणाऱ्या बापाचा पोरगा उपजिल्हाधिकारी झाला… हो ही केवळ प्रेरणादायी गोष्ट नाही तर एका आई बापाने मुलासाठी आणि मुलाने आपल्या आई-बापासाठी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी दिवसरात्र केलेला संघर्ष आहे. (Deputy Collector Samadhan Gaikwad’s Struggle Journey)
उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील लाकीबुकी या छोट्याशा गावातील भास्करराव गायकवाड हे गेली अनेकवर्षे सालगडी म्हणून राबत होते. रक्ताचं पाणी करुन हाडाची काडं करुन राबणाऱ्या या बापाचं कष्ट त्यांचा मुलगा समाधान पाहत होता. मुलाने शिकुन मोठं व्हावं म्हणून बापाने कधीच कष्टाकडे पाठ केली नाही. मुलाने देखील वडिलांचा विश्वास जपत अथक परिश्रम घेत उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली.
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा हा तसा अवर्षणग्रस्त जिल्हा. त्यामुळे शेतीचे उत्पन्न देखील लहरी निसर्गाच्या मर्जीवरच अवलंबून. पाऊसकाळ चांगला झाला तर रोगराईने पिके जाण्याचा धोका आणि पाऊस काळ नाहीच झाला तर पोराबाळांसह दावनीच्या जनावरांची देखील उपासमार. अशा परिस्थितीत झगडत मेहनत घेत समाधान गायकवाड या तरुणाने पदवी, इंजिनिअर आणि आता उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली. समाधान हे गावावतील पहिले पदवीधर आणि उच्च सरकारीपदी निवड होणारे देखील पहिलेच असे व्यक्ती ठरले आहेत.
हे सुद्धा वाचा
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महेंद्र कल्याणकरांचे प्रमोशन
IAS, IPS दुष्काळी भागात घडणार; प्रभाकर देशमुखांचा कल्पक उपक्रम!
लाकीबुकी येथे पहिली ते तीसरीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणाची गावात सोय नव्हती. शिक्षणासाठी तीसरीनंतर दुसऱ्यागावात जावे लागले. घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे घरात साधी लाईट देखील नव्हती अशा परिस्थितीत अभ्यास करुन दहावीत त्यांनी ८७ टक्के गुण मिळविले. त्यानंतर इंजिनिरींगपर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र काही तरी वेगळं करण्याची मनस्थिती स्वस्थ बसू देत नव्हती. नागरी सेवांची परीक्षा देण्याचे ठरवले आणि युपीएससी, एमपीएससी अभ्यास सुरू केला. युपीएससीचे यश थो़डक्यात हुकले. मात्र कच न खाता पुन्हा प्रयत्न सुरू केले. त्यानंतर सन २०१८ मध्ये तहिसीलदारपदी निवड झाली. त्यानंतर देखील त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि सन २०१९ च्या एमपीएससी परीक्षेत यश मिळवत त्यांनी उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घालत परीक्षेत यश मिळविले.