महावितरणने थकीत वीज बिलांच्या वसूलीसाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपूरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे कोलमडून पडलेला शेतकरी त्यामुळे आणखी संकटात सापडला आहे. त्यामुळे ज्या भागात नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त भागातील आणि ज्या शेतकऱ्यांनी चालू वीज बिल भरले असेल अशा शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीज पूरवठा खंडीत करु नयेत असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणहून शेतीपंपांचा वीज पूरवठा खंडीत करुन वीज जोडण्या तोडल्याच्या तक्रारी आल्यानंतर फडणवीसांनी याबाबत आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अतिवृष्टीमुळे ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी शेती पंपांची वीजबिले नियमीत वीज बिले भरावीत, तर अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागातील शेती पंपांची वीज बिले भविष्यात वसूल करता येतील, परंतू सध्याच्या घडीला नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडू नये असे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये महावितरणकडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पंपांच्या वीज जोडण्या कापल्या जात आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आता ही कारवाई थांबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवा वीज बिले भरण्यामध्ये सुट द्यावी असे फडणवीसांनी महावितरणला आदेश दिले आहेत. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांकडे वीज बिलांसाठी तगादा न लावता त्यांच्याकडून सध्याचे वीज बिल घ्या, इतर थकबाकीची वसूली नंतर करा, मात्र शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज तोडू नका, अशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हे सुद्धा वाचा :
VIDEO : महाराष्ट्रातील प्रत्येकाने ‘या’ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे !
Rasana Founder : ‘रसना’ला शरबतचा नंबर 1 ब्रँड करणारे अरीज खंबाटा कालवश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या आदेशामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरु असून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना आता विजेची गरज आहे. खरीपाची पिके अतिवृष्टीने गेल्यामुळे आता रब्बीच्या पिकांवरच शेतकरी थोडीफार आशा लावून आहे. अशावेळी पिकांना वेळेत पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र महावितरणने वीज बिलांच्या वसूलीसाठी वीज जोडण्या कापण्याची कारवाई सुरू केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज जोडण्या कापू नका असे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.