राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरु आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून रोजच काही ना काही वेगळे असे या सभागृहात घडत आहे. पण आज (ता. २४ ऑगस्ट) तर चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. विधिमंडळाचे सभागृह सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आणि ज्यामुळे यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी सत्ताधाऱ्यांमधील आमदार महेश शिंदे आणि विरोधकांमधील आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली. जर राजकारणीच अशी फ्री स्टाईल हाणामारी करणार असतील तर जनतेने आपल्या समस्या कोणासमोर मांडायच्या ? हे राजकारणी खरंच राज्यातील सामान्य नागरिकांचे लोकप्रतिनिधी आहेत का ? असा प्रश्न आता या झालेल्या राड्यानंतर निर्माण झालेला आहे. परंतु सभागृह सुरु होण्याआधीच झालेला लोकप्रतिनिधींमधील राडा हे अत्यंत लाजिरवाणी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला काळिमा फासणारी बाब आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सत्ताधारी गटातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना ‘५० खोके’ म्हणून डिवचले. त्यानंतर सतत विरोधकांकडून एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर बोचरी टीका करण्यात आली. त्यामुळे आज सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. याचवेळी विरोधक देखील तेथे हजार झाले. यावेळी विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या घोषणाबाजीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. काही वेळातच महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यामध्ये हाणामारी झाली.
या घटनेनंतर याबाबतची तक्रार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावेळी अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप सुद्धा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संस्कृतीच जपणारे आहेत, असा माझा समज आहे आणि हा समज खरा असावा असे म्हणत अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे सुद्धा वाचा
Andheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना ?
Sanjay Raut Business Partner Booked : संजय राऊतांना धक्का, सुजित पाटकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Ambadas Danve : सरकारने अंबादास दानवे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हा राडा होण्याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना ५० खोके हा शब्द जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच ते आज सत्तेत असून पण विधिमंडळाच्या पायरीवर आले आहेत. सत्ताधाऱ्यांमधील आमदारांना पायऱ्यांवर येऊन घोषणाबाजी करावी लागतेय, यातूनच त्यांना ५० खोके हा शब्द किती जिव्हारी लागला आहे हे कळून येतंय, असे सांगण्यात आले होते.