टीम लय भारी
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) मंजुरी दिली. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना साष्टांग दंडवत,” असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 19, 2020
“सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं आहे. “आधी ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही,” असंही रोहीत पवार यांनी हल्लाबोल केला.
रिया चक्रवर्ती हिने आपल्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला एफआयआर पाटण्याहून मुंबईला वर्ग करण्यासाठी केलेल्या याचिकेवर न्या. हृषीकेश रॉय यांनी बुधवारी निर्णय दिला. सुशांतचे वडील कृष्णकिशोर सिंह यांच्या तक्रारीवरून बिहार पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर योग्य आहे, तसेच तो सीबीआयकडे सोपवला जाणेही वैध आहे, असे त्यांनी सांगितले.
सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे नोंदवलेल्या एफआयआरसंबंधी सीबीआयमार्फत तपास करण्याची बिहार सरकारची शिफारस आपण स्वीकारली असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वी न्यायालयाला सांगितलं होतं. या तक्रारीत सिंह यांनी रिया व इतर सहा जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करण्यासह इतर आरोप केले होते. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील तपासात बरीच प्रगती केली असून, त्यांनी या प्रकरणी ५६ लोकांचे जबाब नोंदवले असल्याचा युक्तिवाद रियाच्या वकिलांनी केला होता. या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले आहे.