टीम लय भारी
कोल्हापूरः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खानापूर गावात शिवसेनेनं बाजी मारल्याचं चित्र आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या गावात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन पक्ष एकत्र आले होते. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर गावातील या युतीची चर्चा होती. या चुरशीच्या लढाईत शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांच्या गावात सत्ता मिळवली आहे.
शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मदत होती. मात्र, शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी या युतीविरोधात कडवी झुंज देत शिवसेनेचा विजय खेचून आणला आहे. खानापूरमध्ये ६ जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे. तर, विरोधी आघाडी ३, राष्ट्रवादी काँग्रेस- २ आणि काँग्रेसला १ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. परंतु, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या गावातच भाजपला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.
प्रकाश आबीटकर हे जिल्ह्यातील शिवसेनेचे सध्या एकमेव आमदार आहेत. चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूक राधानगरी मतदार संघातून लढविणार असल्याची चर्चा दोन वर्षापूर्वी होती. त्यातून आबीटकर व पाटील यांच्यात वादाला तोंड फुटले होते. आबिटकरांनी त्यांना लढून दाखवा असे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर दोघातील राजकीय अंतर वाढले होते. आता दादांच्या खानापूर गावातच आबिटकरांनी शिवसेनेला विजय मिळवून दिला आहे.
दरम्यान, कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातदेखील भाजपला यश मिळवता आलेलं नाही. शिरोळ तालुक्यातील नांदणी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर, काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या सडोली खालसा गावात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आहे.