मंत्रीपदाची खूर्ची मिळाली की, सरकारी खर्चाने सगळे चोचले पुरविण्याचे शहाणपण पुढाऱ्यांना सुचू लागते. गाडी, बंगले, दालन, नोकर – चाकर, भोजन अशा बाबी हव्या हव्याशा वाटू लागतात. एवढेच नव्हे तर वास्तुशास्त्र, शुभ दिन, लकी असलेली तारीख, शुभ आकडे, खूर्चीच्या दिशेपासून ते शौचालयाच्या दारापर्यंत प्रत्येक बाब शास्त्रानुसारच करण्याचा हट्ट या मंत्र्यांचा असतो. अशातच विज्ञानापेक्षा देव – धर्माला महत्व देणारे सरकार सध्या सत्तेत आले आहे. सत्तेत आलेल्या बहुतांश मंत्र्यांनी ‘होऊ दे खर्च’ अशी भूमिका घेतली आहे.
याचे कारण म्हणजे, मंत्रालयातील (Mantralaya) दालने व बंगले यांच्या दुरूस्तीची कामे राज्य सरकारने हाती घेतली आहेत. मंत्र्यांच्या हट्टापोटी मंजुरीअगोदरच अनेक कामे सुरू केली आहेत. बऱ्याच कामांच्या तर निविदासुद्धा काढलेल्या नाहीत.
संतापजनक म्हणजे, सगळ्याच मंत्र्यांची दालने व बंगले नवीन करकरीत आहेत. तरीही मंत्र्यांच्या अंधश्रद्धेपोटी दुरूस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. या दुरूस्तीच्या कामासाठी अंदाजे १०० कोटी रूपयांचा चुराडा करण्याची मोहिम सुरू आहे.
‘महाविकास आघाडी’चे सरकार अडिच वर्षे सत्तेत होते. त्या सरकारमधील मंत्र्यांनी सुद्धा बंगले व दालनांवर करोडो रूपयांचा चुराडा केला होता. अनेक मंत्र्यांची तर वर्षभर कामे सुरू होती. जयंत पाटील, धनंजय मुंडे, अमित देशमुख या मंत्र्यांचे बंगले, तसेच डॉ. नितीन राऊत, उदय सामंत यांची दालने ही कामे तर जवळपास वर्षभर सुरू होती. अन्य मंत्र्यांच्या दालनांची व निवासस्थानांची सुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. त्यामुळे सध्यस्थितीत असलेली दालने व बंगले नवीन करकरीत आहेत. एक ते दीड वर्षांपूर्वीच त्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी झालेली आहे.
हे सुद्धा वाचा
Sharad Pawar शरद पवारांच्या लाडक्या आमदाराने चालवली एसटी
ऐकावे ते नवलच, नापास केले म्हणून विद्यार्थ्यांनी मास्तरांनाच धुतले
पण देव, धर्म व श्रद्धा पाळणाऱ्या नव्या मंत्र्यांना जुन्या मंत्र्यांची पणवती नको आहे. खूर्चीची दिशा, डोक्यावरील झुंबर, सोप्यांची दिशा, फोटोंची जागा, शौचालयाचे दरवाजे, किचन स्थान या सगळ्या बाबी मंत्र्यांना वास्तुशास्त्रानुसारच हव्या आहेत. त्यामुळे १०० कोटींचा चुराडा झाला तरी चालेल पण पणवती नको, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी झाल्यानंतर पुन्हा पुढील अडिच वर्षानंतर येणारे नवे मंत्री सुद्धा असाच आर्थिक चुराडा करेल, असे सूत्रांनी सांगितले.
मंत्र्यांची ही हौस पूर्ण करताना कंत्राटदार व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचेही उखळ पांढरे होत असते. शौचालयांच्या टमरेल्यापासून ते आरामदायी खूर्चीपर्यंत, सागवानी लाकडापासून ते चकचकीत लाद्यापर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या वस्तूंवर उधळपट्टी करण्याचे मार्ग कंत्राटदार व पीडब्ल्यूडीचे अधिकारी शोधत असतात. त्यामुळे मंत्र्यांची अंधश्रद्धा अधिकारी व कंत्राटदारांसाठी फायद्याचीच ठरणार आहे.