टीम लय भारी
मुंबई : राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार राज्याचा कारभार पाहत आहेत. पण या सरकारमधील मंत्री मंडळाचा अद्यापही विस्तार झालेला नाही. त्यामुळे नव्या सरकारच्या मंत्री मंडळात कोणाची वर्णी लागणार? याचे फक्त तर्कवितर्क लावले जात आहेत. पण शिंदे गटातील शेवटचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मंत्री पद कोणाला नकोय ? असे म्हणत त्यांना मंत्री पद हवे आहे, असे अप्रत्यक्षपणे का असेना पण सांगितले आहे.
हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी अगदी शेवटच्या क्षणाला उद्धव ठाकरे यांना सोडून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला साथ दिली. त्यामुळे बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना खूप मोठा धक्का बसला. जो आमदार इतर आमदारांनी बंडखोरी केली म्हणून ढसाढसा रडला. बंडखोरी केलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात परत या, असे सांगत होता. त्या व्यक्तीने ऐनवेळी केलेल्या बंडखोरीमुळे सर्वांना आश्चर्य वाटले.
दरम्यान, संतोष बांगर यांना मंत्री पद हवे आहे का ? असे विचारले असता, ‘मंत्री पद कोणाला नको आहे ? मंत्रिपद दिलं तर पुन्हा दहा हत्तीचं बळ माझ्यात येईल.’ असेही त्यांनी सांगितले. पण ‘मी मंत्रिपदाच्या अपेक्षेने कुठलंही काम करत नाही. माझ्या नेत्यांना माझ्यावर विश्वास असेल तर मुख्यमंत्री जे आदेश देतील त्या आदेशाचं मी पालन करणारा कडवट शिवसैनिक आहे. साहेबांच्या मनात असेल तर माझ्यावर जबाबदारी टाकतील. मी स्वतः मंत्रिपद मागणार नाही.’ असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.
एकंदरीत काय तर, शिंदे गटातील आमदारांना मंत्री पद हवे आहे पण त्यांना त्याबाबत आता सरळ मागणी करणे देखील जड जात असल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून जाणवून येत आहे. त्यामुळे कितीही नाही म्हंटले किंवा आम्ही पदासाठी हावरट नाही असे म्हणणारे आमदार पण मनातून मात्र आम्हाला मंत्री पद हवेच आहे या अविर्भावात असल्याचे जाणवून येत आहे.
हे सुद्धा वाचा :