मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंच्या जीवालाही धोका, आमदार रवी राणा यांचा दावा
टीम लय भारी
मुंबई : सचिन वाझे यांच्या अटकेमुळे ‘मातोश्री’च्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदार रवी राणा यांनी केली आहे. तसेच या प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार असून आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा रवी राणा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.
“देवेंद्र फडणवीस हे याआधी मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे आता सचिन वाझे यांचीही हत्या केली जाण्याची शक्यता आहे,” असा दावाही रवी राणा यांनी केला आहे.
अटकेत असलेल्या सचिन वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे ‘मातोश्री’ अडचणीत आले आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंचीही हत्या होऊ शकते, अशी भीती आमदार राणा यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, “सचिन वाझेंनी तपासात एनआयएला जी माहिती दिली आहे त्यावरुन महाराष्ट्रात येणा-या काळात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. फक्त परमबीर सिंग यांना बाजूला करुन हे प्रकरण संपणारं नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभोवती फिरत आहेत. सचिन वाझेंना प्लानिंग करण्यासाठी कोणी मदत केली हेदेखील लवकरच पुढे येईल”.
“ज्याप्रकारे हिरेन यांचा मृत्यू झाला त्यानुसार सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. एनआयने पूर्ण लक्ष ठेवून संरक्षण दिलं पाहिजे,” अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.