दसरा मेळाव्यासाठी संपुर्ण राज्यभरातील विविध भागांतून लोकांनी मुंबईत हजेरी लावली होती. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आलेला दसरा मेळावा चांगलाच वादळी ठरला. यावेळी दोन्ही गटाकडून मेळाव्यासाठी खास खबरदारी घेण्यात आली होती. अगदी खाण्या – पिण्यापासून ते गाडी पार्कींच्या जागेपर्यंत सगळ्याचेच नियोजन करण्यात आले होते, परंतु शिंदे गटाच्या नियोजनाचा यावेळी बट्ट्याबोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई विद्यापीठाची मोकळी जागा शिंदे गटाने पार्किंगसाठी घेतली खरी परंतु तिथे आज केवळ दारुच्या बाटल्यांचा खच आणि कचराच कचरा दिसून येत असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला डोक्याला हात लावायची पाळी आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील दसरा मेळाव्यासाठी होणारी मोठी उपस्थिती लक्षात घेता मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. परंतु यावेळी नियोजनबद्ध कारभार होणे अपेक्षित असताना अगदी दुसऱ्याच दिवशी सकाळी दारुच्या बाटल्यांचा खच, मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक कचरा आढळून आल्याने विद्यापीठाची सपशेल कचराकुंडी झाल्याचे चित्र दिसून आले. विद्यापीठात पार्कींगची व्यवस्था करण्यास युवा सेना, छात्र भरती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी याआधी विरोध केला होता, परंतु मुंबई महापालिकेकडूनच परवानगीचे पत्र प्राप्त झाल्याने विद्यापीठाकडे पर्याय उरला नसल्याचे सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा…
Mukesh Ambani : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या व्यक्तिला बिहारमधून अटक
Dasra Melava 2022 : ठाकरेंचे भाषण प्रतिक्रिया देण्यायोग्य नाही, फडणवीसांकडून टीका
दरम्यान, बुधवारी मुंबईत शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी राज्याच्या विविध ठिकाणांहून अनेक बसगाड्या भरून आल्या होत्या. त्या सगळ्याच गाड्या यावेळी विद्यापीठाच्या प्रांगणात पार्क करण्यात आल्या. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकजण रात्री तिथेच राहिले, तिथेच त्यांंच्या जेवणासोबतच अन्य व्यवस्था करण्यात आल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यापीठाचे प्रांगण संपुर्ण कचऱ्याने भरून गेल्याचे दिसले. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी संपुर्ण प्रांगणाची पाहणी केली आणि एवढा कचरा पाहून त्यांना धक्का बसला.
यावेळी बोलताना प्रदीप सावंत म्हणाले, सर्वत्र कचरा आणि मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. अनेक भागात शौच केल्याने दुर्गंधी सुद्धा पसरली आहे. हा सर्व कचरा गोळा करून हेलिपॅडवर टाकला जात असून तिथे कचऱ्याचे वर्गीकरण करून तो गाडीतून नेणार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी केवळ कचराच नव्हे तर विद्यापीठाच्या कलिना संकुलातील बीकेसी दिशेचे गेट तुटल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे, त्यामुळे विद्यापीठाचे नुकसान सुद्धा झाल्याचे समोर आले आहे. शिंदेसेनेच्या या अंदाधुंदी नियोजनामुळे विद्यापीठाची अवस्था कचरकुंडीसारखी झाल्याने अनेकांकडून याप्रकरणी टीका करण्यात येत आहे.