भारताच्या जी- 20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची तीन दिवसीय बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा जय्यत तयारी केली आहे. या वेळीही रस्ते स्वच्छता व सौंदर्यीकरणावर भर देण्यात आला आहे. दरम्यान सदस्य राष्ट्रांचे 100 हून अधिक प्रतिनिधी, काही राष्ट्रांचे निमंत्रित या कार्यगटाच्या बैठकीला उपस्थित राहतील. त्यामुळेच मुंबईत होणाऱ्या या दुसऱ्या परिषदेच्या निमित्ताने मोक्याच्या ठिकाणी रोषणाई आणि झगमगाट करण्यात आला आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी पूर्वतयारी कामांची पाहणी केली.
जी-20 परिषदेच्या व्यापार व गुंतवणूक समूहाची बैठक मुंबईत आज मंगळवार, 28 मार्च ते गुरुवार, 30 मार्च या कालावधीत होत आहे. जी- २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद ‘भारताला मिळाल्यानंतर दुसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकांसाठी परदेशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पहिली बैठक झाली त्या वेळी विमानतळ परिसरातील रस्त्यांनी कधी नव्हे ती कात टाकली होती. तसेच या बैठकांसाठी बीकेसी आणि कुलाबा येथील रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले होते. पदपथ, रस्ते दुभाजक यांची रंगरंगोटी करण्यात आली होती.
विशेषतः जी-20 बैठकांच्या परिसरामध्ये रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची अतिरिक्त कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच उद्यान विभागाने ठिकठिकाणी हरित सुशोभीकरण केले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व परिसरांमध्ये विशेष मोहीम राबवून स्वच्छतेची कामे पूर्ण केली आहेत.
मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे लोकार्पण केले. त्यावेळी पंतप्रधानांना मुंबई फेरीवालामुक्त, छान, सुंदर दिसावी; हेरिटेज परिसर प्रसन्न दिसावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनासह पोलिस यंत्रणेचा आटोकाट प्रयत्न केले. एक दिवसासाठी का होईना मुंबईच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. रस्ते अगदी चकाकून उठले होते. त्यामुळे केवळ कोणी प्रतिष्ठित व्यक्ती मुंबईला भेट देणार म्हणून मुंबईचे सौंदर्य आणि स्वच्छतेकडे भर न देता नेहमी मुंबईवर कृपा करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा :
G-20 च्या बैठकीमुळे मंबईतील रस्ते 16 डिसेंबर पर्यंत बंद; पाहा काय आहेत पर्यायी मार्ग
डिसेंबर 2022 मध्ये देखील पार पडलेल्या जी-20 परिषदेच्या पहिल्या बैठकीप्रमाणेच या बैठकीचीही बहुतांश ठिकाणे व अभ्यागतांची निवास व्यवस्था असणारी हॉटेल्स कायम आहेत. गेल्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या परदेशातील सदस्यांचे स्वागत करण्यासाठी रस्ते अवघ्या काही दिवसांत सजले होते. या वेळी ब्रॅण्ड हयात हॉटेल (सांताक्रूझ) ते ताज लॅण्ड्स एण्ड (वांद्रे) परिसर यासह सांताक्रूझ, कलिना परिसर, कलानगर, वांद्रे-कुर्ला संकुल, मिठी नदी परिसर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभाग कार्यालय परिसर, वांद्रे बॅण्ड स्टॅण्डचा यात समावेश आहे.