रामचरितमानस ही मनुस्मृतिइतकीच द्वेष पसरविणारी रचना असल्याचे विधान करणाऱ्या बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. (RamCharitManas Like ManuSmruti) एकीकडे भगव्या संघटना मंत्रिमंडळातून त्यांच्या हकालपट्टीसाठी आक्रमक झाल्या आहेत. दुसरीकडे, मंत्री चंद्र शेखर मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आपण काहीही चुकीचे बोललेलो नसून वस्तुस्थिती कथन केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ट्विटरवर “इंडिया विथ चंद्र शेखर” हा ट्रेंड जोरात सुरू आहे. (India With Chandra Shekhar)
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) ज्येष्ठ नेते आणि बिहारचे शिक्षण मंत्री चंद्र शेखर हे पूर्वी महाविद्यालयीन शिक्षक होते. नंतर ते राजकारणात आले आहेत. बुधवारी पाटणा येथील नालंदा मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातील भाषणात चंद्र शेखर यांनी रामचरितमानस ही मनुस्मृतिइतकीच द्वेष पसरविणारी रचना असल्याचे म्हटले होते. खालच्या जातीतील लोक शिक्षित होऊन विषारी होतात, असे ‘रामचरितमानस’मध्ये म्हटल्याचे त्यांनी सांगितले होते. ‘मनुस्मृती’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचारवंत एम.एस. गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ने सामाजिक फूट निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे ‘रामचरितमानस’ सारख्या धार्मिक ग्रंथांनीही द्वेष पसरवल्याचा दावा चंद्र शेखर यांनी केला होता. लोकांनी ‘मनुस्मृती’ जाळली आणि ‘बंच ऑफ थॉट्स’लाही अशाच कारणांसाठी विरोध केला आणि त्यात नवीन काही नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
“अधम जाती मे विद्या पाये,
भयतु यथा दुध पिलाये.”
अर्थ – शिक्षण मिळाल्यावर खालच्या जातीचे लोक हे विषारी होतात. दूध पाजल्यानंतर विष उगळणाऱ्या सापासारखेच हे आहे.
चंद्र शेखर यांनी ‘रामचरितमानस’ महाकाव्यातील पुढील दोहे उद्धृत केले – “अधम जाती मे विद्या पाये, भयतु यथा दुध पिलाये.” याचा शाब्दिक अर्थ असा – “शिक्षण मिळाल्यावर खालच्या जातीचे लोक हे विषारी होतात. दूध पाजल्यानंतर विष उगळणाऱ्या सापासारखेच हे आहे.” त्यांच्या या भाषणानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
चंद्र शेखर यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी भारतीय जनता पक्ष, हिंदू संघटना आणि हिंदू संतांनी केली आहे. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याचीही मागणी होत असताना चंद्र शेखर त्यांच्या टिप्पणीवर ठाम आहेत. त्यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले, की “मी माफी मागणार नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे, मी काहीही चुकीचे केलेले नाही आणि त्यासाठी माफी मागण्याची गरज नाही.” भाजपच्या अनेक नेत्यांनी चंद्र शेखर यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले की, चंद्र शेखर हे आरजेडीच्या हिंदूविरोधी परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. चंद्र शेखर यांनी वेगवेगळ्या संदर्भात चुकीचे दोहे जोडून उद्धृत केले. त्यांच्या या अज्ञानमूलक वक्तव्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवावे.
मेरा बयान बहुजनों के हक में है और मैं उस पर अडिग व कायम रहूंगा।
ग्रंथ की आड़ में गहरी साजिश से देश में जातीयता व नफरत का बीज बोने वाले बापू के हत्यारों के प्रतिक्रिया की परवाह नहीं करता। वे इस कटु सत्य को भी विवादित बयान समझते हैं तो यह उनकी समझ हो सकती है।। pic.twitter.com/YwU5bF0Ze1
— Prof. Chandra Shekhar (@ProfShekharRJD) January 12, 2023
हे सुद्ध वाचा :
मागच्या दाराने मनुस्मृती आली’; प्रकाश आंबेडकरांकडून चिंतेचा सूर
भाजपचे हिंदुत्व मनुवादी; शिवसेनेचे धर्मनिरपेक्ष – प्रा. जोगेंद्र कवाडे
‘नवनीत राणांवर कारवाई का होत नाही?’ न्यायालयाने पोलिसांना झापले
भाजपचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी आणि नीरज कुमार बबलू यांनी, चंद्र शेखर यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांना मानसिक रुग्णालयात उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे. चंद्र शेखर यांनी सनातनींचा अपमान केल्याचा दावा अयोध्येतील हिंदू पुजारी जगद्गुरु परमहंस यांनी केला आहे. चंद्र शेखर यांनी माफी मागावी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना तातडीने त्यांच्या पदावरून हटवावे, असेही परमहंस म्हणाले. आरजेडी, जदयू, काँग्रेस, डावे पक्ष आणि एचएएमसह सत्ताधारी महागठबंधनच्या नेत्यांनी अद्याप या विषयावर काहीही भाष्य केलेले नाही.