घोडचूक लक्षात आल्यानंतरही प्रशासन ढिम्म
टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’ महामारीमध्ये काही ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा किती ढिसाळ, बेफिकीर व मुर्दाडपणे काम करीत आहे, याचा अत्यंत खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. यांत खासगी रूग्णालयाबरोबरच सरकारी यंत्रणेने कमालीचा हलगर्जीपणा दाखविल्याचे उघड झाले आहे ( Sharad Pawar, Rajesh Tope on Satara visit).
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आज सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या तोंडावरच हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळी 9 वाजता शरद पवार कराड येथे ‘कोरोना’ संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.
घटना अशी घडली आहे की, साताऱ्यामधील एका खासगी रूग्णालयात 72 वर्षीय महिला भरती केली होती. ही महिला मृत झाली. नैसर्गिक मृत्यू म्हणून रूग्णालयाने तिचा मृतदेह नातेवाईकांकडे दिला. शंभरपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल दोन दिवस उलटले, अन् जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘प्रेस नोट’मुळे मृत महिला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह होती असे समोर आले. पांढरवाडी ( ता. माण ) या गावात ही घटना घडली आहे.
मृत महिला ‘कोरोना’ग्रस्त असूनही तिच्यावर रितीरिवाजानुसार जाहीर अंत्यसंस्कार झाल्याची पहिली घोडचूक रूग्णालयाकडून घडली. पण त्यानंतर सरकारी प्रशासनाने आणखी घोडचुका केल्या. अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोन दिवस महिलेच्या ‘कोरोना’ची माहिती कुणालाच नव्हती.
दोन दिवसानंतर पहिली घोडचूक लक्षात आली, पण त्यानंतरही प्रशासन अद्याप ढिम्म आहे. ‘कोरोना’ची माहिती उघड होताच प्रशासनाने ताबडतोब पुढील वेगवान हालचाली करणे गरजेचे होते. त्यानुसार संपर्कात आलेल्या लोकांना कॉरन्टाईन होण्याचे आदेश देणे गरजेचे होते. पण तहसिलदार अथवा प्रांत यांनी गावातील या घटनेची तिसऱ्या दिवसापर्यंत थोडीशीसुद्धा दखल घेतली नव्हती.
मृत महिलेचा तिसऱ्या दिवशी म्हणजे आज सावडण्याचा विधी होणार होता. हा विधी करावा किंवा करू नये याबाबतही प्रशासनाने कसल्याही सुचना गावकऱ्यांना दिलेल्या नाहीत. या विधीच्या वेळी सुद्धा मृतदेहाच्या संपर्कात आलेले लोक पुन्हा एकत्रित गोळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या घटनेकडे दुर्लक्ष करून तहसिलदार व प्रांत काल ( शनिवारी ) रात्री झोपा काढत होते. त्यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे अधिकारी रात्री दोन वाजेपर्यंत या घटनेची दखल घेत होते. ‘लय भारी’नेच टोपे यांचे खासगी सचिव चंद्रकांत थोरात व विशेष कार्य अधिकारी डॉ. सचिन जाधव यांना ही माहिती दिली.
त्यावेळी रात्रीच्या 12 वाजल्या होत्या, तरीही या दोन्ही अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. घटनेचा तपशिल जिल्हा प्रशासनाला कळविण्यासाठी या अधिकाऱ्यांची रात्री 2 वाजेपर्यंत धडपड सुरू होती.
हे सुद्धा वाचा
आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण
राजेश टोपेंचा खासगी रूग्णालयांना दणका, मनमानी शुल्क आकारणीला चाप लावण्यासाठी भरारी पथके
Covid19 : सुप्रिया सुळेंना लोक विचारताहेत, राजेश टोपे डॉक्टर आहेत का ?
रूग्णालयाचा हलगर्जीपणा
सदर महिलेचा ‘सातारा हॉस्पीटल’ या खासगी रूग्णालयात गुरूवारी मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी महिलेची ‘कोरोना’ चाचणी घेण्यात आली होती. पण त्याचा अहवाल आलेला नव्हता. अहवाल आलेला नसतानाच शुक्रवारी सकाळी संबंधित रूग्णालयाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता.
मृतदेहाला साधे ॲपरनही लपेटलेले नव्हते. रूग्णालयापासून 40 किलोमीटर अंतरावरील गावात हा मृतदेह रूग्णवाहिकेतून नेण्यात आला. यावेळी एका नातलगाने मृतदेहाशेजारी बसून प्रवास केला होता.
गावात मृतदेह आणल्यानंतर शंभरपेक्षा जास्त लोक अंत्यसंस्कारासाठी जमा झाले. यावेळी रितीरिवाजानुसार सर्व धार्मिक विधी करण्यात आले. मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून अंत्यदर्शन घेण्यात आले. जवळपास दोन तास हा मृतदेह अंत्यदर्शऩासाठी ठेवला होता. ‘कोरोना’ची पुसटशीही कल्पना नसल्याने लोक निर्धास्तपणे अंत्यदर्शन घेत होते.
मृत महिलेचे दोन मुलगे, सुना, पाच लहानगी मुले व नातलग अशा सुमारे 10 ते 15 जणांनी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेतले. त्यानंतर लोकांनी हा मृतदेह ताटीवरून स्मशानभूमीत नेण्यात आला. त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाकडून निष्काळजीपणा व अक्षम्य हलगर्जीपणा दाखविण्यात आला आहे. अशा हलर्जीपणातूनच ‘कोरोना’चे रूग्ण वाढतात. तरूणांचा ‘कोरोना’ बरा होतो. पण वयस्क व आजारी लोकांचा जीव ‘कोरोना’ घेऊन जातो याची जाणीव सातारा प्रशासनाने ठेवायला हवी. याबाबत आज मी साताऱ्याच्या बैठकीत विचारणा करेलच. साताऱ्याबाबत आणखीही काही तक्रारी आहेत. तिथे कोरोना हाताळण्यात हलगर्जीपणा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मला आता साताऱ्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल
– राजेश टोपे, आरोग्य मंत्री
संपर्कातील लोक एकमेकांमध्ये मिसळले
शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार झाले. पण शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संबंधित महिलेला ‘कोरोना’ची लागण झालेली होती हे कोणालाच ठाऊक नव्हते. सातारा जिल्ह्याच्या माहिती कार्यालयाच्या ‘प्रेस नोट’चा संदेश व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता.
या संदेशात जिल्ह्यात आढळलेल्या ‘कोरोना’ रूग्णांची गावनिहाय माहिती दिली होती. त्यात पांढरवाडी येथील 72 वर्षीय महिलेचाही ‘कोरोना’बाधित म्हणून उल्लेख केला होता.
या संदेशामुळे गावकरी, कुटुंबिय यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण संबंधित मृत महिलेच्या संपर्कात आलेले सगळेजण अन्य अनेक लोकांमध्ये मिसळले होते. त्यामुळे संभाव्य भितीने गावकऱ्यांना ग्रासले.
‘कोरोना’साठी कार्यरत असलेली गावातील आपत्ती निवारण समिती, ग्रामसेवक हे सुद्धा गडबडून गेले. संबंधित खासगी रूग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेह नातलगांना दिला होता. त्यामुळे हा प्रकार होऊन गेला.
ही घटना उघड झाल्यानंतर तालुक्याचे आरोग्य अधिकारी शनिवारी सायंकाळी गावात आले. मृतदेहाच्या संपर्कात कोण कोण आले याची माहिती त्यांनी घेतली. काही सुचनाही केल्या. आशा वर्करने संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारीसाठी औषधेही दिली.
गावकरी, नातलग, आपत्ती निवारण समिती, ग्रामसेवक अशा सगळ्याजणांची झोप उडाली होती. पण माण तालुक्याच्या तहसिलदार व प्रांताधिकारी यांनी या प्रकाराची कसलीही दखल घेतली नव्हती. गावकऱ्यांकडे साधी चौकशीही केली नव्हती किंवा निरोप सुद्धा दिला नव्हता, असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
आम्हाला ‘कॉरन्टाईन’ होण्याबाबत कुठूनही सुचना नाहीत
या अंत्यसंस्कारासाठी मी उपस्थित होतो. त्या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त लोकांची हजेरी होती. अंत्यसंस्कारासाठी मुंबई व पुण्यावरूनही नातलग आले होते. अंत्यसंस्कार होऊन दोन दिवस आम्ही सगळेजण नियमित कार्य पार पाडली आहेत. काल (शनिवारी ) सायंकाळी संबंधित मृत महिला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर आम्हा सगळ्यांची झोप उडाली आहे. सरकारी यंत्रणेकडून कॉरन्टाईन व्हा, किंवा काही खबरदारी घ्या’ याबाबत आमच्यापर्यंत कोणताही निरोप आलेला नाही.
या प्रकारामुळे संपूर्ण गाव हादरून गेले आहे. पण प्रशासनाकडून अद्याप तरी काहीच दखल घेतली गेली नाही अशी माहिती मृत महिलेच्या घरानजीक राहणाऱ्या एका व्यक्तीने ‘लय भारी’ला दिली.
रूग्णालय, तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
या गंभीर प्रकारासाठी संबंधित खासगी रूग्णालय, माण तालुक्यातील तहसिलदार व प्रांत यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
स्थानिक आमदारही निर्धास्त
माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे मते मागण्यासाठी या गावात सतत येत असतात. आपल्या राजकीय स्वार्थासाठी लोकांमध्ये आपांपसात भांडणे लावण्यात त्यांना फार स्वारस्य आहे. परंतु या गंभीर प्रकाराची दखल गोरे यांनी सुद्धा घेतलेली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.