टीम लय भारी
मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील संपुर्ण राजकीय सूत्रे बदलली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांचे अचानक वर्चस्व वाढल्याने फुटलेल्या आमदारांनी शिवसेनेचा शिंदे गटच स्थापन केला आणि शिवसेना वि. शिवसेना वाद सुरू झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची ढाल करीत शिंदे गट शिवसेनेवर अधिकारवाणीने बोलू लागला त्यावर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल करीत “माझे वडील का चोरताय” असा सवाल त्यांनी यावेळी केला. यावर प्रत्युत्तर देत “बाळासाहेब ठाकरे यांना प्रायव्हेट लिमिटेड करु नये” असा सल्लाच भाजप नेते रवी राणा यांनी ठाकरेंना माध्यमांशी बोलताना दिला.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी नुकतीच मुलाखत घेतली ती अनेक अर्थानी वादळी ठरली. यावेळी शिंदेसेनेने बाळासाहेबांचे नाव वापरल्याची टिका करत ठाकरे म्हणाले, त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशिर्वादाने काम करावे, माझे वडिल का चोरताय… माझा तर विश्वासघात केलाच, तर लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? असा सवाल करून शिंदेगटावर आरोप केला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा भाजप नेते रवी राणा यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला फिक्सिंग मॅच म्हणत टीका केली आहे. राणा पुढे म्हणाले, मुलाखतीत संजय राऊत यांचेच प्रश्न असून उद्धव ठाकरेंनी उत्तर काय द्यायचे हे सुद्धा राऊत यांनी आधीच ठरवलेलं आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊतांची कटपुतली झाले आहेत. परंतु, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना प्रायव्हेट लिमिटेड करु नये. कारण, शिंदे गटाचीच खरी शिवसेना आहे, असा दावा करीत उद्धव ठाकरेंसह त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला तसेच उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली असल्याचा थेट आरोप राणा यांनी यावेळी राऊत यांच्यावर केला.
हे सुद्धा वाचा…
शिक्षकांची अंधश्रद्धा; विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखले