27 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeक्रीडाआजपासून रंगणार ‘आयपीएल’चा महासंग्राम!

आजपासून रंगणार ‘आयपीएल’चा महासंग्राम!

Indian Premier League (आयपीएल) या विश्वातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या 16व्या अध्यायाला आज शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून आयपीएलचा हा महासंग्राम दोन महिने रंगणार आहे. पहिल्याच सामन्यात युवा कर्णधार हार्दिक पंड्या अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर असेल. या सामन्याला रात्री साडेसातला सुरुवात होईल.

या अगोदर आयपीएलचा उद्घाटन सोहळा संध्याकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहितीही आयपीएलने दिली आहे. त्यानंतर सात वाजता सीएसके आणि जीटी सामन्याची नाणेफेक होईल. त्यानंतर साडेसात वाजल्यापासून पहिला सामना खेळवला जाईल. उद्घाटन समारंभ आणि सामना स्टार स्पोर्ट्स इंडियावर थेट प्रक्षेपित केले जाईल. त्याच वेळी, ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर होईल.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन वर्षांत संघांना आपापल्या घरच्या मैदानांवर सामने खेळता आले नव्हते. यंदा मात्र सर्व संघांना आपल्या चाहत्यांसमोर खेळण्याची संधी लाभणार आहे. त्यामुळे पाहुण्या संघांना सामने जिंकणे अधिक आव्हानात्मक ठरू शकेल. हा सामना अहमदाबाद येथील 1 लाख 32 हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

गुजरातने आयपीएल पदार्पणातच जेतेपद मिळवण्याची किमया साधली होती, तर चार वेळचा विजेता चेन्नई संघ नवव्या स्थानी राहिला. त्यामुळे गुजरातच्या संघाची आपली दमदार कामगिरी सुरू राखण्याचे लक्ष्य असेल, तर चेन्नईच्या संघ जेतेपदासाठी आपली दावेदारी सिद्ध करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. या सामन्यात विशेषत: धोनीच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. धोनी आता केवळ आयपीएल खेळत असल्याने चाहत्यांना त्याचा खेळ पाहण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. धोनीने आपला अखेरचा अधिकृत सामना गेल्या आयपीएलमध्ये 20 मे रोजी खेळला होता. तो गेल्या काही आठवडय़ांपासून चेन्नईच्या संघासोबत कसून सराव करतो आहे. त्यामुळे आपल्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून देण्यासाठी धोनी नक्कीच उत्सुक असेल.

आजपासून रंगणार ‘आयपीएल’चा महासंग्राम!

यंदाची IPL 2023 स्पर्धा काहीशी वेगळी ठरणार आहे. प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर), व्हाईड आणि नो-बॉलसाठी डीआरएस च्या वापरास परवानगी, तसेच नाणेफेकीनंतर अंतिम 11 खेळाडूंची घोषणा, चेंडू टाकण्यापूर्वी यष्टिरक्षकांच्या हालचालींवर मर्यादा अशा काही नव्या नियमांचा यंदाच्या हंगामात अवलंब केला जाणार आहे. या नियमांचा दहाही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक कसा वापर करतात व त्याचा सामन्यांच्या निकालावर कितपत परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

यंदाच्या हंगामात चार नवे कर्णधार पाहायला मिळणार आहेत. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या जायबंदी असलेल्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांना नव्या कर्णधारांची निवड करावी लागली. दिल्लीचे डेव्हिड वॉर्नर आणि कोलकाताचे नितीश राणा नेतृत्व करेल. त्याचप्रमाणे एडीन मार्करमची सनरायजर्स हैदराबादच्या, तर शिखर धवनची पंजाब किंग्जच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

हे सुद्धा वाचा : ‘औकात मे रहो पाकिस्तानियो’: पाकिस्तानी पत्रकाराने PSLची IPLशी तुलना केल्याने भारतीय क्रिकेट चाहते संतापले

क्रिकेटपटू केदार जाधवचे वागणे खेळाला लाथा मारण्यासारखे; शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

पाकिस्तानला मोठा झटका ; रावलपिंडीमध्ये बॅन होणार इंटरनॅशनल क्रिकेट

आयपीएल म्हणजे दर्जेदार क्रिकेटसह मनोरंजनाची पर्वणी असे समीकरण झाले आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असणार का? विराट कोहली आणि तारांकित खेळाडूंचा भरणा असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर दमदार पुनरागमन करणार का? अशा विविध प्रश्नांमुळे यंदाची आयपीएल स्पर्धाही रंगतदार ठरणार आणि जवळपास दोन महिने क्रिकेटरसिकांचे भरपूर मनोरंजन होणार हे जवळपास निश्चितच आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी