पुरूषांचा क्रिकेट टी-20 विश्वचषक स्पर्धा (Men’s T-20 Cricket World Cup) सुरू होण्याची वाट भारतातील क्रिकेट चाहते नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहते पाहत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी भारतीय संघ व्यवस्थापन भारताच्या फंलदाजीच्या क्रमात काही प्रयोग करण्याच्या विचारात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेच्या आधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आगामी टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघ व्यवस्थापन भारताचा पूर्व कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) सलामीवीराची भूमिका देऊ शकते. नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप टी-20 स्पर्धेमध्ये विराट कोहलीने अफगाणिस्तान संघाविरूद्ध तडाखेबाज शतक झळकावून पुन्हा जुन्या लयीमध्ये येण्याचे संकेत दिले होते. अफगाणिस्तान संघाविरूद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या अनुपस्थितीत कोहलीने भारतीय डावाची सुरूवात करत फक्त 61 चेंडूमध्ये 122 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे, टी-20 क्रिकेटच्या प्रकारात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर आहे.
विराट कोहलीला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सलामीवीर म्हणून पाठवण्याच्या संभावनेबाबत रोहित शर्मा म्हणाला की, तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असताना जर तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील तर ती नक्कीच चांगली बाब आहे. तुमचा प्रत्येक खेळाडू कोणत्याही स्थानावर फंलदाजी करण्यामध्ये पटाईत हवा असे मला वाटते. जेव्हा आम्ही फंलदाजीच्या क्रमात कोणतेही बदल करतो तेव्हा आम्हाला हे पाहायचे असते की कोणता फंलदाज कोणत्या स्थानावर फंलदाजी करण्यासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे तसे प्रयोग सातत्याने करण्यात काहीही गैर नाही.
हे सुद्धा वाचा –
Fever : तापाची साथ आल्यामुळे पाँडेचेरीमधील शाळा आठ दिवस बंद राहणार
MNS : भाजपला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे सांगून मनसेने प्रचाराचा नारळ फोडला
शर्माने पुढे असे नमूद केले की, आम्हाला आमच्या खेळाडूंच्या गुणवत्तेची जाणीव आहे आणि ते संघासाठी काय करू शकतात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्ही आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी केवळ दोन सलामी फंलदाजांची निवड केली आहे. विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा पर्याय आमच्याकडे खुला आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघासाठी डावाची सुरूवातसुद्धा करतो आणि त्या भूमिकेत त्याने चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आम्ही कोहलीला विश्वचषक स्पर्धेत सलामीवीर म्हणून पाठविण्याचा नक्कीच विचार करत आहोत.
भारतीय संघ व्यवस्थापनाने विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला तर उपकर्णधार के. एल. राहुलला संघामध्ये त्याची जागा निश्चित करणे अवघड जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेत राहुल त्याच्या लौकीकाला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. त्याबदद्ल एका पत्रकाराने राहुलला प्रश्न विचारला असता, राहुल त्या पत्रकारावर भडकला आणि त्याने पत्रकाराला प्रतिप्रश्न विचारला की ‘याचा अर्थ मी संघामधून बाहेर पडावं का?’ प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुलने शेवटी नमूद केले की आगामी सामन्यांमध्ये त्याच्या फंलदाजीला सूर गवसण्याबाबत तो आशावादी आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू –
मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर