जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा काल कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. अलीकडेच कृषीमंत्री सत्तार यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मविआकडून शिंदे-फडणवीस सरकरविरोधात जोरदार निदर्शने देखील करण्यात आली होती. याच अनुषंगाने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर व रानवड येथील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची कृषीमंत्री सत्तार यांनी पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष व पिकांच्या झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून घेण्याच्या सूचनाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित कृषि अधिकाऱ्यांना दिल्या.
आज कन्नड तालुक्यातील पिशोर,पळशी बुद्रुक,साखरवेल शिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. pic.twitter.com/Fl0ucwZuzS
— Abdul Sattar (@AbdulSattar_99) March 19, 2023
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा करून झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेद्वारे सकारात्मक निर्णय त्वरीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री सत्तार यांनी यावेळी दिली.
या पाहणी दौऱ्यात कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसिलदार शरद घोरपडे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
काय म्हणाले होते कृषीमंत्री?
“शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहे.” माझ्या मतदारसंघात फिरुन आलो, शेतीचं फार नुकसान झालं नाही. वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही सत्तार यांनी सांगितलं, यामुळे एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी निदर्शने करून सत्तरांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.
हे सुद्धा वाचा :
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर NCPचा राडा