राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पहाटे दोन वाजता त्यांना आलेल्या एका नोटिसीमुळे ते अडचणीत आले आहेत. त्यानंतर रोहित पवार यांनी ट्वीट करत या संदर्भात कुणाचेही नाव न घेता दोन मोठ्या नेत्यांवर आरोप केलेत. या दोन नेत्यांच्या सांगण्यावरून पहाटे दोन वाजता माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई केल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. भल्या पहाटे नोटीस आणि त्यानंतर रोहित पवारांनी केलेले ट्वीट यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.
रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे आणि आक्रमक आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवारांना साथ देत सातत्याने अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. अशी पार्श्वभूमी असताना आज पहाटे दोनच्या सुमारास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बारामती अॅग्रो या कंपनीला पहाटे दोन वाजता नोटीस बजावून ७२ तासांत प्लांट बंद करण्यास सांगितले आहे. रोहित पवार यांनीच ट्वीट करत ही माहिती पुढे आणली आहे.
दरम्यान, या संदर्भात रोहित पवार यांनी ‘दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठली तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली’ असे ट्वीट करत गंभीर आरोप केला आहे.
राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.
युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 28, 2023
त्याचवेळी ‘सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे’, असाही टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
विशेष म्हणजे याच बारामती ॲग्रो कारखान्याने गाळप लवकर केले, अशी तक्रार भाजप नेते राम शिंदे यांनी गेल्यावर्षी साखर आयुक्ताकडे केली होती. राज्य सरकारने गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू करण्याचा आदेश दिला होता. पण बारामती अॅग्रो साखर कारखान्याने १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते राम शिंदे यांनी केला होता. त्यानंतर बारामती ॲग्रो कारखान्याने कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा
शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून १६ नोव्हेंबरला भारतात येणार, सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न फळाला
बारामती अॅग्रो कारखान्याची ही पार्श्वभूमी असतानाच आता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ७२ तासांत प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता परिस्थिती रोहित पवार कशी हाताळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.