नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे गट यांच्यातील वैर हे कोणाला माहित नसेल असे क्वचितच कोणी असेल. नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र हे कायमच ठाकरे कुटुंब आणि ठाकरे गटावर टीका करताना, तोफ डागताना दिसून येत असतात. कधी कधी तर ठाकरे विरुद्ध राणे हा वाद इतका विकोपाला जातो की, यांच्याकडून अगदी खालच्या पातळीवर टीका करण्यात येते. नारायण राणे यांच्याकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर हल्लाबोल करण्यात आला. एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देत नारायण राणेंकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तर ठाकरे गटातील काही संपलेल्या व्यक्तींवर बोलणे बंद केले आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर खोचक टीका केली.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कधी घराच्या बाहेर आले नाही. आता ते नेमके कोणत्या कारणामुळे मध्यावधी निवडणुका लागणार असे बोलत आहेत, हे त्यांनाच माहित. मुळात मध्यावधी निवडणुका लागण्यासाठी काही तरी घडणे, आपत्ती येणे अपेक्षित असते. परंतु आता उद्धव ठाकरे यांना नैराश्य आल्याने नैराश्येचे भावनेतून त्यांनी मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे वक्तव्य केल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. स्वतःची सत्ता गेली, मुख्यमंत्री पद गेले म्हणून उद्धव ठाकरे मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे बोलत आहेत, असा टोला देखील राणेंनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला.
यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांना ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे आमदार भाजप फोडणार असल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता, ‘चंद्रकांत खैरे रिटायर्ड झाले आहेत. मुळात संपलेल्या व्यक्तींबाबत मला विचारू नका,’ असे म्हणत नारायण राणेंनी खैरेंवर खोचक टीका देखील केली. दरम्यान, आगामी गुजरात निवडणुकीसाठी नारायण राणे हे देखील प्रचाराकरिता गुजरातला जाणार असल्याची माहिती नारायण राणे यांच्याकडून यावेळी देण्यात आली.
हे सुद्धा वाचा
CM Eknath Shinde : राज्यात पुन्हा घडणार राजकीय घडामोडी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार गुवाहाटीला
Sharad Pawar : निवडणुकीसाठी कामाला लागा; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
यावेळी नारायण राणे यांनी कोकणातील कुपोषणाबाबत प्रश्न उपस्थित केला. कोकणात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने कुपोषित कुटुंब दत्तक घ्यावीत आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करावे, असा सल्ला यावेळी नारायण राणेंकडून महाविकास आघाडीला देण्यात आला. तर, मी केंद्रात असतो, राज्यातील इतर घडामोडींची माहिती देवेंद्र फडणवीस यांना अधिक असतेअसे देखील यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.