टीम लय भारी
पुणे : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे विरोधक ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जात मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे म्हटले आहे. (Parth Pawar aggressive for Maratha reservation)
यावेळी त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही सरकारकडे केली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट करत आपले म्हणणे मांडले आहे.
Devastated to hear of the tragic death of Vivek who committed suicide for the cause of Maratha reservations. Before a chain reaction of such unfortunate incident starts, Maratha leaders have to wake up & fight for this cause. Requesting Maha govt to step in to solve the crisis. pic.twitter.com/r8c3YQUoO0
— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
‘मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावे आणि लढावे. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत अशी विनंती आहे,’ असे पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही’.
‘मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसेच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र,’ असेही ते म्हणाले आहेत.