टीम लय भारी
सिंधुदुर्ग : खाजवून खरूज करून घेणे, दाखवून अवलक्षण करणे, आ बैल मार मुझे अशा अनेक म्हणी मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत. या म्हणींची आठवण आज नारायण राणे यांना झाली असेल. सौजन्यशिलता धाब्यावर बसवून राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले. पण त्यानंतर ठाकरे यांनी राणेंना शेलक्या शब्दांत झोडपून काढले (Uddhav Thackeray criticized to Union Minister Narayan Rane).
चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे व नारायण राणे हे दोन्ही कट्टर विरोधक आज एकत्र व्यासपीठावर आले होते. प्रोटोकॉलनुसार नारायण राणे यांनी भाषण केले. या भाषणात राणे यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेले प्रत्युत्तर राणे यांना दिर्घकाळ स्मरणात राहील, असेच होते.
नवाब मलिकांनी अखेर जाहीर केलं ‘त्या’ भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव!
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्या कानात काहीतरी पुटपुटले; विनायक राऊतांनी पेढा दिला
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे तोंड भरून कौतुक करताना राणे यांच्यावर आसूड ओढला. शिंदे साहेब, तुम्ही इतक्या लांब राहूनही मराठी संस्कार विसरला नाहीत. हे या मराठी मातीचे वैशिष्ट्य आहे. पण मातीत जर बाभळी उगवल्या त त्या मातीचा दोष नसतो, अशी त्यांनी राणे यांच्यावर टीका केली.
आपल्या शेजारी गोवा आहे. पण कोकणातीलही वैभव कमी नाही. उलट काकणभर सरस आहे. पण एवढी वर्षे विमानतळ का नाही झाले. तुम्हाला भांडीघाशी का करावी लागली, असाही सवाल ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता केला.
बाळासाहेब ठाकरे यांना खोटे बोललेले आवडत नव्हते असा उल्लेख नारायण राणे यांनी केला होता. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी राणे यांच्यावर शरसंधान केले. बाळासाहेबांना खरोखरच खोटारडी माणसे आवडत नव्हती म्हणून त्यांनी खोटारड्यांना शिवसेनेतून हाकलून लावल्याची तोफ डागली.
आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण बनावट, नवाब मलिक यांनी एनसीबीचे पितळ उघडे पाडले
Maharashtra CM Uddhav Thackeray inaugurates Chipi airport
भाषण करताना काहीजण पाठांतर करून बोलतात, तर काहीजण मळमळीने बोलतात, अशा शब्दांत ठाकरे यांनी राणेंची खिल्ली उडविली.
नजर लागू नये म्हणून काळं तीट लावण्याची परंपरा आहे, असे सांगत राणे यांना काळ्या तिटाची उपमा ठाकरे यांनी दिली.
नारायणराव तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक आहे. पण कोकणातील लोकं हुशार आहेत. ती आंधळी नाहीत. म्हणूनच त्यांनी खासदार विनायक राऊत यांना वारंवार निवडून दिल्याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.
लघू का असेना, सूक्ष्म का असेना पण तुमच्याकडे मोठे खाते आहे. पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो. म्हणून म्हणतात तिळगूळ घ्या गोड गोड बोला. तुम्हाला चांगली संधी मिळाली आहे, त्या संधीचे सोने करा, असे उपदेशाचे डोस सुद्धा ठाकरे यांनी पाजले.
आजचा दिवस राजकीय भाषणे करण्याचा नाही. कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्वाचा दिवस आहे. आज तरी राजकीय जोडे बाहेर ठेवायला हवे होते. आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांची परंपरा पुढे घेऊन जायला हवे. तलवार चालवायची असेल तर देशाच्या व महाराष्ट्राच्या शत्रूंवर चालवावी. आपल्याच लोकांवर चालवू नका, असेही ठाकरे शेवटी म्हणाले.