30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजअसा आहे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महुचा इतिहास

असा आहे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महुचा इतिहास

थोरले सुभेदार मल्हारराव होळकर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,महाराज यशवंतराव होळकर,महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कार्यकर्तुत्वाने बहरलेल्या माळव्यातील महु (mahu ) गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar ) यांचा जन्म झालेला असुन बाबासाहेबांच्या जन्मभूमी महुच्या ऋणानुबंधाचा इतिहास ( history of Mhow) आपण जाणुन घेऊयात . माळव्याच्या विजयामुळे सन १७२८ मध्ये मल्हारराव होळकर यांना पेशव्यांनी बारा परगणे बहाल केले . या बारा परगण्यात इंदौर परगणा होता.कान्ह नदीच्या तिरावर वसलेल्या इंदौरला मल्हाररावांनी राजधानी म्हणून निवडले . विंध्याचल व अरवली पर्वताच्या मध्यभागी स्थिरावलेल्या माळव्याला मल्हाररावांच्या रुपाने अष्ठावधानी सुभेदार मिळाला .सुभेदार मल्हारराव होळकरांनी आयुष्यभर रणांगणावर तलवार गाजुन मराठ्यांच्या राज्याच्या सिमा अटकेपार वाढवल्या . त्यामुळेच दक्षिणेतील मराठे उत्तरेचे मालक म्हणून नावलौकिकास पात्र झाले.(This is the history of Mhow, the birthplace of Dr. Babasaheb Ambedkar)

पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या नंतर त्यांच्या पुत्रवधू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी माळवा सुजलाम सुफलाम करुन देवभूमीला गतवैभव प्राप्त करुन दिले. अहिल्यादेवी नंतर तुकोजीराव यांनी दोन वर्षे होळकरशाही सांभाळली. तुकोजीराव नंतर काशीराव आणि काशीराव नंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनी होळकरशाहीची नव्याने स्थापना करुन भानपुरा येथे राजधानी स्थापन केली. यशवंतरावांच्या निधनानंतर त्यांची पत्नी महाराणी तुळसाबाई होळकर यांनी १८११ ते १८१७ असे सहा सात वर्षे होळकरशाहीचा कारभार केला . पुढे दि.१८ डिसेंबर १८१७ रोजी विश्वासघाताने महाराणी तुळसाबाई होळकर यांचा शिरच्छेद करण्यात आला.इंग्रजांनी होळकर फौजेतील फितुराच्या हातुन तुळसाबाईंना संपवले. दुसऱ्या दिवशी भर पावसात झालेल्या लढाईत एकाकी पडलेल्या होळकर फौजेचा निसटता पराभव होवून ६ जानेवारी १८१८ रोजी मंदसौर येथे होळकर इंग्रजात शांततेचा करार होवून २१ डिसेंबर १८१८ रोजी महिदपुर करार संपन्न झाला. महाराजा मल्हारराव होळकर तृतीय, तात्या जोग आणि जाँन माल्कम यांच्यात विविध कलमानुसार महिदपुर तह झाला.या तहानंतर भानपुरा येथून होळकरांची राजधानी पुन्हा इंदौरला हलवण्यात आली .

महु हे गाव इंदौर परगण्यातील होळकरांच्या जहागिरीचे गाव होते. महु शेजारी न्यु गुराडीया नामक गाव असुन द्वितीय तुकोजीराव होळकर यांचे वडील भाऊ होळकर यांना जहागीर म्हणून ते बहाल करण्यात आले होते. भाऊ होळकर यांचे पुत्र सर काशीराव होळकर यांची पत्नी न्यु गुराडीया गावात वास्तव्यास होती न्यु गुराडीया गावात भाऊ होळकर यांच्या घराण्यातील लोकांच्या समाध्या आणि घरांचे अवशेष आजही पहायला मिळतात. महुपासुन जवळ असलेल्या बडगोंदा गावात महाराजा यशवंतराव होळकर यांची मोठी लष्करी छावणी होती. इंग्रजासोबत या बडगोंदा गावात लढाई होवून इंग्रजांचा मोठा पराभव झाला होता. महु गाव आणि आजुबाजच्या गाव होळकरशाहीतील सरदारांना जहागिर म्हणून बहाल करण्यात आले होते. वंशपरंपरेने आजही जहागीरीच्या गावात होळकरशाहीतील शिलेदार, जहागीरदार लोकांचे वारसदार वास्तव्यास आहेत.

इंदौर परगण्यातील महु गाव हे राजधानीच्या उत्तरेला पंधरा मैल अंतरावर इंदौर महेश्वर रस्त्यावर असल्याने यास पूर्वीपासून महत्त्व होते.होळकर राज्याचे हे सैनिकी प्रशिक्षणाचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने जाँन माल्कमने ब्रिटिश छावणी म्हणून महु गावाला निवडले होते. महिदपुर करारातील कलम सात (7) नुसार महु कँन्टाँनमेंट बोर्डाची स्थापना सर जाँन माल्कम यांनी सन १८१८ मध्ये केली. जनरल, पाँलिटीकल,आणि मिल्ट्री चार्ज माल्कम यांचेकडे होता.महुपासुन ३२७ मैलांवर मुंबई शहर असुन ४०७८ हेक्टर क्षेत्र असलेल्या महुचे तेव्हा ६८३६ रुपये वार्षिक उत्पन्न होते. (मिलीटरी हेडकाँर्टर आँफ वार MHOW) या महु गावाशेजारी असलेल्या सैनिकी छावणीत दि.१४ एप्रिल १८९१ रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पोटी जन्म झाला.भन्ते धर्मशील यांनी १९७० मध्ये संघर्ष सुरू करुन महु गावातील सर्वे नं ६७ मध्ये २२५०० वर्गफुटावर असलेले बँरेक क्षेत्र सरकारसोबत संघर्ष करुन आर्मीकडुन सन १९७६ ला मिळवले. बाबासाहेबांच्या जन्मभूमी स्मारकासाठी जागा मंजुरी मिळवून दि.१४ एप्रिल १९९१ रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शताब्दी वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी त्या जागेवर आधार शिळा लावली होती.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या आंबावडे नावाच्या गावाचे मालोजी सपकाळ वतनदार होते जातीने महार असलेल्या मालोजींना आठ आण्यांचे वतन असुन मालनाक उर्फ मालोजी सपकाळ हे ब्रिटिश फौजेत हवालदार म्हणून नोकरीत होते.मालोजींना चार अपत्ये त्यामध्ये तीन मुले आणि एक मीराबाई नामक मुलगी होती. मालोजींच्या पोटी सन १८४८ मध्ये रामजींचा जन्म झाला.वयाच्या अठराव्या वर्षी ते “१०६ सँपर्स अँण्ड मायनर्स या ब्रिटिश फौजेच्या तुकडीत सैनिक म्हणून दाखल झाले.त्यांच्या सोबत फौजेत सुभेदार असलेल्या लक्ष्मण मुरबाडकर यांच्या कन्या भीमाबाई यांचेशी सन १८६७ साली रामजींचा विवाह झाला.रामजींची सन १८८४ ला फौजेत नायक पदावर बढती झाली पुढे “१०६ सँपर्स अँण्ड मायनर्स फलटण बंद झाल्याने त्यांची १०७ पायनियर्स मध्ये बदली करण्यात आली होती.पुढे सन १८९४ मध्ये रामजींना सुभेदार पदावर बढती मिळाली. सन १८९१ पर्यंत सुभेदार रामजी सपकाळ यांना चौदा अपत्ये झाली चौदावे अपत्ये म्हणून भीमसुर्य डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होय.बाबासाहेबांच्या जन्मानंतर पुढे दोन वर्षांनी भीमाबाई यांचे निधन झाले त्यानंतर रामजींनी जीजाबाई यांचेशी विवाह केला होता.बाळाराम, गंगा,रमाबाई, आनंदराव, तुळसा आणि भीवा अर्थात भीमराव असे सात अपत्ये जीवित होती.रामजींचा दापोली येथून सन १८८८ मध्ये महुला आल्यानंतर ,सन १८९४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सुभेदार रामजी महु येथून दापोली येथे गेले सन १८९४-१८९६ असे दोन वर्षे ते दापोली कँम्पमध्ये मुख्याध्यापक म्हणून रामजींनी नोकरी केली पुढे ते भीवाच्या शिक्षणासाठी दापोली येथून ते सातारा (१८९६),सातारा येथून मुंबई आणि मुंबईत आले रामजींनी दि.४ एप्रिल १९०८ रोजी बाबासाहेबांचा भीकुजी धोत्रे वलंगकर यांची कन्या रमाबाई समवेत विवाह लावुन दिला.

पुढे २ फेब्रुवारी १९१३ रोजी सुभेदार रामजी आंबेडकर यांचे निधन झाले.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे पुनित झालेल्या महुचे सरकारने बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आंबेडकरनगर म्हणून नाव परिवर्तीत केले असुन सुभेदार मल्हारराव , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकोत्तर कार्याने पुनित झालेल्या भूमीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाल्याने महु गावास विशेष महत्त्व प्राप्त झाले.
समता, बंधुता आणि न्यायाची मोट बांधणा-या इतिहासातील होळकर आंबेडकर ऋणानुबंधास डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने कोटी कोटी वंदन. रामभाऊ रुस्तुमराव लांडे
अभ्यासक होळकर राजघराणे, इंदौर
9421349586

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी