लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेतील एकमेव धनगर आमदार नारायण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी अचानक तिकिट नाकारले, पण दुसऱ्या बाजूला धनगर समाजाची मते मिळविण्यासाठी त्यांच्याकडून ‘सोशल इंजिनिअरींग’चा प्रयत्न सुरू आहे. ठाकरेंच्या या प्रयत्नाबद्दल धनगर समाजातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नारायण पाटील निवडून आले होते. अवघ्या 250 मतांनी त्यांचा विजय झाला होता. परंतु त्यांच्या विजयामुळे सोलापूरमधील करमाळ्यामध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच आपला खुंटा मजबूत केला होता. करमाळ्यामध्ये शिवसेनेची कसलीही ताकद नसताना नारायण पाटील यांनी स्वबळावर विजय मिळविला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रश्मी बागल यांचा पराभव केला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी रश्मी बागल यांना शिवसेनेत घेतले. नारायण पाटील यांचे तिकिट कापून शिवसेनेने रश्मी बागल यांना तिकिट दिले आहे. एका धनगर समाजाच्या आमदारावर उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला आहे. त्यामुळे धनगर समाजात नाराजी आहे.
धनगर समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी आता या समाजाला गोंजारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शनिवारी उद्धव ठाकरे यांनी धनगर, बंजारा, माळी, वंजारी अशा अठरापगड जातीच्या नेत्यांसोबत एक बैठक आयोजित केली होती. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना निश्चित प्रयत्न करेल, असे आश्वासन उद्धव यांनी विविध समाजाच्या प्रतिनिधींना दिले.
दुसऱ्या बाजूला सांगोल्यातील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या जागी आपणास उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाऊसाहेब रूपनर यांनी थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली. रूपनर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रूपनर यांच्या रूपाने उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाला गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गणपतराव देशमुख यांना दुखवून भाऊसाहेब रूपनर उद्धव ठाकरे यांना भेटले, याचा राग धनगर समाजामध्ये आहे.
एका बाजूला नारायण पाटील या धनगर आमदाराचे तिकिट उद्धव ठाकरे यांनी कापले, तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्याच नाराज निकटवर्तीयांना उद्धव ठाकरे फूस लावत असल्याचा संदेश धनगर समाजात गेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये धनगर समाज शिवसेनेला हिसका दाखवेल अशी भावना संदिप काळे या धनगर कार्यकर्त्याने व्यक्त केली आहे.