केंद्र सरकारच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘बंगळुरू – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर’ मंजूर झाला आहे. हा कॉरिडॉर म्हसवड येथे होणार होता. परंतु तो आता कोरेगाव या ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा प्रकल्प कोरेगाव येथे व्हावा यासाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे आग्रही आहेत. परंतु कोरेगाव येथील स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत.
या सर्व जमिनी बागायती आहेत. बागायती जमिनी जर गेल्या तर शेतकरी भिके कंगाल होती, अशी शेतकऱ्यांना भिती वाटत आहे. त्यामुळे हा प्रकल्प नको, आम्हाला आमच्या जमिनी हव्या आहेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी शेतकऱ्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना तोंडावरच आम्हाला हा प्रकल्प नको आहे, अशा शब्दांत ठणकावले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे या प्रकल्पात हितसंबंध गुंतले आहेत. ते हा प्रकल्प जबरदस्तीने शेतकऱ्यांवर लादत आहेत, अशी शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. दुसऱ्या बाजूला म्हसवडमधील शेतकरी मात्र हा प्रकल्प व्हावा यासाठी आग्रही आहेत.