सध्याच्या घडीला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा आकडा मोठा असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत अनेकजण आपापल्या परीने प्रयत्नशील असतात. यामध्ये कोणी कोचिंग क्लासेस, तर कोणी स्वतःच अभ्यासाची तयारी करण्याचा पर्याय निवडतात. अशावेळी महाविद्यालयांतील स्पर्धा परिक्षा केंद्र सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात, या केंद्रांमधून सहजरीत्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनाला सुद्धा भरारी येते आणि ते जोमाने तयारीला लागतात. माण तालुक्यातील दहिवडी येथे सुद्धा युपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमात मुंबई अतिरिक्त आयुक्त डाॅ. नितीन वाघमोडे यांनी आवर्जून हजेरी लावत खास टीप्स देत विद्यार्थांचे मनोबल वाढवले आहे.
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जर प्रयत्न केले गेले तर कोणतेही ध्येय अशक्य नाही तसेच अभ्यासात सातत्य असेल, मनामध्ये कष्ट करण्याची जिद्द असेल तर आपल्याला हवे ते सहज मिळवता येते, असे म्हणून डाॅ. नितीन वाघमोडे यांनी यशस्वी होण्याचा मंत्रच यावेळी विद्यार्थांना दिला. दहिवडी येथील दहिवडी काॅलेजच्या स्पर्धापरिक्षेच्या मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काल युपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी वाघमोडे बोलत होते.
या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य उचित पवार, सुनिल जाधव, उपप्राचार्य डाॅ. बरकडे, स्पर्धा परिक्षा समन्वयक डाॅ. गायकवाड, मान तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, युवक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रम शिंगाडे, शिवछत्रपती करीअर अकॅडमी संचालक नारायण अहिवळे आदी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा…
Sonia Gandhi : सोनिया गांधींची डोकेदुखी वाढली
यावेळी डाॅ. नितीन वाघमोडे यांनी युपीएससी आणि एसपीएससी करु इच्छिणाऱ्यांसाठी अभ्यासाचा सोपा मार्ग समजावून सांगत उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी उत्सुकता निर्माण केली, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सुद्धा यावेळी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक गोष्टींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपस्थित अनेक मान्यवरांनी सुद्धा आपापल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले.
यावेळी डाॅ. नितीन वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि खेळीमेळीचे वातावरणात स्पर्धापरीक्षांचे महत्त्व सांगत, विद्यार्थ्यांनी नेमकी कशी तयारी करायला हवी याबाबत त्यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना वाघमोडे म्हणाले, नेमकं काय वाचायला हवं हे कळलं पाहिजे. आज इंटरनेटच्या माध्यमातून वाचनासाठी खूप काही उपलब्ध असलं तरी त्यातलं सुद्धा काय वाचायला हवं हे शोधता आलं पाहिजे. आमच्यावेळी कसं होतं पुस्तक जरं मिळालं नाही तर वाचायचं नाही, नोट्स नाही मिळालं तर वाचायचं नाही. एक चार पानी नोट्स मिळालं तेवढं वाचलं काम संपलं पण आताची परिस्थिती वेगळी आहे, असे म्हणून नेमकं वाचन यावर वाघमोडेंनी लक्ष वेधले आहे.
डाॅ. नितीन वाघमोडे पुढे म्हणतात, जसं नेमकं वाचन कळलं पाहिजे तसंच त्यासाठी तुम्हाला ती परीक्षा सुद्धा कळाली पाहिजे. त्या परीक्षेची पातळी काय आहे आणि त्या पातळीसाठी काय वाचायचं ते तुम्हीच ठरवलं पाहिजे असे म्हणून अगदी सोप्या पद्धतीने वाचन आणि परीक्षेचे नाते उलगडून सांगितले आहे. हे नाते जपण्यासाठी सुद्धा डाॅ वाघमोडे यांनी काही पर्याय सुचवले आहे, जसे एक चांगला पेपर वाचायची सवय लावून घेतली पाहिजे, पर्यायी विषय घेणार आहे त्याची जास्तीत जास्त माहिती मिळवणे, सिलॅबस प्रमाणे तयारी करणे आणि त्याबाबत नोट्स तयार करणे असे सहज सोपे पर्याय त्यांनी यावेळी सांगितले.
अभ्यासासोबतच व्यायामाची सुद्धा सवय लावली पाहिजे, खेळ खेळले पाहिजेत आणि मुलाखतीच्या दृष्टीने एखादा छंद जोपासला पाहिजे. कारण मुलाखतीत सहज एक प्रश्न येतो की छंद काय, त्यामुळे अशावेळी तुमचा तुम्हाला छंद माहित असायलाच पाहिजे. प्रत्येकाचा काहीतरी छंद असतो, त्यामुळे तो ओळखता आला पाहिजे असे म्हणून या स्पर्धापरीक्षांमध्ये अभ्यासासोबतच इतर गोष्टी सुद्धा कशा महत्त्वाच्या असतात हे डाॅ. नितीन वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासाबाबत खास टीप्स देताना डाॅ. नितीन वाघमोडे यांनी यशाचा एक मूलमंत्र सुद्धा यावेळी दिला. यावेळी बोलताना डाॅ. वाघमोडे म्हणाले, आजवरच्या इतिहासात 70 टक्के ग्रामीण विद्यार्थ्यांनीच स्पर्धा परिक्षा क्षेत्र निवडले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी आणि यशस्वी होण्याची जी शक्यता आहे ती अधिक असल्याचे जाणवते. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो त्यात पालकांना विश्वासात घेत धाडसपुर्वक निर्णय घेत कठोर परिश्रम घेतले आणि योग्य मार्गदर्शन मिळाले की यशस्वी होता येते असे म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहित केले.