दिवसेंदिवस प्लास्टिकचा वापर प्रचंड वाढत चालला आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर सरकारने बंदी घालण्याचा निर्णयही अमलात आणला आहे. पण तरीदेखील पॉलीथीनचा वापर कमी होताना दिसत नाही. पॉलिथिनचे विघटन होत नसल्यामुळे निसर्गालाही धोका निर्माण झाला आहे. लोकांना प्लास्टिकच्या वापरापासून प्रवृत्त करण्यासाठी प्रशासनामार्फत विविध क्लुप्त्या वापरण्यात येतात. जम्मू काश्मीरमधील सादीवारा या गावचे सरपंच फारूख अहमद गनी यांनीदेखील लोकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. पॉलिथिनचा कचरा द्या आणि सोन्याचे एक नाणे घेऊन जा..! अशी योजना त्यांनी लोकसांसाठी सुरु केली आहे. (Give plastic waste, carry gold coin..!)
खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लस्टिकच्या पिशव्या तसेच इतर घरगुती वापरासाठी उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू सर्रास उघड्यावर टाकण्यात येतात. त्यामुळे नद्या, तलाव, विहिरी यांसारखे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि निसर्गाला हानी पोहोचत आहे. याला पायबंद बसावा म्हणून फारूख गनी यांनी पॉलिथिनच्या मोबदल्यात सोन्याचे नाणे देण्याची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. फारूख गनी यांनी सांगितले की,”आपण जर पॉलीथीनचा निष्काळजीपणे होणार वापर बंद केला नाही तर पुढील १० वर्षांत शुद्ध पाण्याचे स्रोत बंद होतील. स्वच्छतेबद्दल आपण काळजी घेतली नाही तर प्यायला शुद्ध पाणी मिळणार नाही.” सरकार आणि प्रशासनामार्फत यासंदर्भात योग्य त्या उपायोजना राबविण्यात येत आहेत. पण लोकांनीही त्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया फारूख गनी यांनी व्यक्त केली आहे.
पॉलिथिनचे कचऱ्यातही विघटन होत नाही त्यामुळे ते निसर्गासाठी धोकादायक आहे. त्यातूनच मला ही संकल्पना सुचली. पॉलिथिन द्या आणि सोने घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. पेशाने वकील असणारे गनी म्हणाले की, जे आम्हाला २० क्विंटल पॉलीथीन आणून देतील त्यांना आम्ही एक सोन्याचे नाणे देतो. मागील वर्षांपासून त्यांनी हे संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी गावातील रहिवाशांना आम्ही त्यांच्या घरात सुका कचऱ्यासाठी वेगळा कचऱ्याचा डबा ठेवण्यास सांगितले आहे. २० क्विंटलपेक्षा कमी वजनाचे पॉलिथिन आणून देणाऱ्या नागरिकांनाही आम्ही चांदीचे नाणे बक्षीस देणार असल्याचे गनी यांनी सांगितले. समाजात चांगले बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांनाही या संकल्पनेबाबत परिसरातील युवकांनी कळविले आहे. जेणेकरून ही योजना अधिक परिणामकारकरीत्या राबविली होईल, असे गनी यांनी पुढे सांगितले.
मुंबईतील प्रदूषणास कारणीभूत असलेल्या घटकांत प्लास्टिकचा मोठा वाटा आहे. प्रवाशांनी टाकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळेही पावसाळ्यात रेल्वे रूळांवरील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हंटले होते. प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे समुद्रातील पर्यावर्णावरही विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे मासेमारी धोक्यात आल्याचे मच्छीमारांनी म्हंटले आहे. मुंबईत दर महिन्याला सुमारे २५ टन प्लास्टिकचा कचरा जमा होत असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.
हे सुद्धा वाचा
धोक्याची घंटा : मुंबईतील दूषित हवेमुळे होतोय फुफ्फुसाचा कर्करोग
VIDEO : मुंबई बुडणार…! संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचा इशारा