महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सात न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे जाऊ शकतो का? हा सध्या केवळ रंज्यांच्याच नव्हे तर देशभरातील राजकीय आणि कायदे वर्तुळात चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्रात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे सेनेचे 16 आमदार अपात्रतेच्या फेऱ्यात आहेत. त्याविषयी जरी सुप्रीम कोर्टाने प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले, तरी पक्षांतर बंदी आणि एकूणच सत्तासंघर्षाच्या कायदेशीर बाबींवर निर्णय कोण घेणार, यावर अनेक मते-मतांतरे आहेत.
राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.आर. शाह, न्यायमूर्ती कृष्णमुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकून घेतल्या आहेत. ही सर्व सुनावणी 16 मार्च रोजीच पूर्ण झालेली आहे. आता फक्त निकाल यायचा राहिला आहे. घटनापीठाने राखून ठेवलेला हा निकाल कधी येणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. महाराष्ट्रातील सत्तसंघर्ष अंतिमत: 7 न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे जाऊ शकतो का, याही शक्यतेबाबत अनेक मते-मतांतरे आहेत. त्याविषयी सुप्रीम कोर्टात गेली अनेक वर्षे कार्यरत मराठी वकिलांची मते जाणून घेऊया.
अॅड. आकाश काकडे
या प्रकरणाची सुनावणी सुरू होतानाच पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने म्हटले होते, की आम्ही सर्व प्रकरण एकदा ऐकून घेऊ. त्यानंतर आम्हीच त्याची सुनावणी घ्यायची, की ते 7 न्यायाधीशांच्या पूर्ण घटनापीठाकडे पाठवायचे, त्याबाबत निर्णय घेऊ. आधीच्या एकूण सर्व घटना-घडामोडींकडे पाहता आता हे प्रकरण पुन्हा 7 न्यायाधीशांकडे पाठविले जाईल, असे वाटत नाही.
अॅड. प्रशांत केंजळे
निकाल राखून ठेवलेल्या प्रकरणात 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांकडे पाठवू शकते. तर, दुसरा जो कायदेशीर, घटनात्मक पेचप्रसंग आहे, तो संत न्यायाधीशांच्या पूर्ण घटनापीठाकडे पाठविला जाऊ शकतो. त्यावर पूर्णपीठ निकाल देईल. मात्र, त्याचा परिणाम अपात्रतेच्या निर्णयावर होणार नाही.
हे सुद्धा वाचा :
- शिंदे सरकार जाणार की राहणार? निकालाबाबत पाच न्यायाधीशात सहमती नसेल तर?
- महाराष्ट्रातील प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जाऊ शकते, की सुप्रीम कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवू शकते?
- महाराष्ट्रात पुन्हा पूर्वीची परिस्थिती येऊ शकते का? घड्याळाचे काटे उलटे फिरविले जाऊ शकतात का?
- जर न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी निकाल आला नाही तर काय?
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की झिरवाळ?
या पंधरवड्यात कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल माईलस्टोन असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार की जाणार ? या संदर्भात “झी 24 तास” वृत्तवाहिनीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील मराठी वकीलांशी खास बातचीत केली. अॅड. सिद्धार्थ शिंदे, अॅड. आकाश काकडे, अॅड. कश्मीरा लांबट, अॅड. श्वेतल शेफाल, अॅड. यतीन जगताप, अॅड. प्रशांत केंजळे, अॅड. राज पाटील ही अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारी दिग्गज मंडळी “झी 24 तास”च्या वार्तालापात सहभागी झाली होती.