टीम लय भारी
मुंबई : शिवसेनेत गेल्या १० दिवसांत राजकीय इतिहासातील सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेला पडलेल्या भगदाडामुळे पक्षाला पुन्हा एकदा नव्याने सर्व काही सुरु करावे लागेल, असेच दिसून येत आहे. याबाबत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. प्रत्येक शिवसैनिकाचा आवाज उद्धव ठाकरेंच्या मागे खंबीरपणे आहे, अशी भावना आदित्य ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या दोन ते अडीच वर्षात जे काही चांगले काम झाले ते लोकांसमोर आहे. आम्ही आजपर्यंत कामाबद्दल काहीही बोललो नाही पण आम्ही केलेली कामे लोकांसमोर आहेत, असेही यावेळी आदित्य ठाकरेंचे यांच्याकडून सांगण्यात आले. आज बंडखोरी केलेले आमदार सत्तेत बसून खूप काही बोलत आहेत, पण हे सर्व त्यांनी स्वतः आरशात बघून बोलावे, असा सल्ला आदित्य ठाकरेंनी सत्तेत बसलेल्या बंडखोर आमदारांना दिला आहे.
हे सुद्धा वाचा :
शिंदे – फडणविसांच्या नावाने शेतकऱ्यांचा ‘ठणाणा’
शहाजी बापूंनी ‘होयची मान डोलवली‘ – हरि नरके
फडणवीस आणि शहा यांच्यात नेमकं बिनसलंय काय ?
सभागृहात बहुमत चाचणी सिद्ध करताना बंडखोरी केलेल्या ३९ आमदारांनी व्हीप विरोधात मतदान केले. पण बंडखोर आमदारांच्या बाजूने व्हीप असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या व्हीपला मान्यता दिली. पण ‘आमचा अधिकृत व्हीप आहे. न्यायप्रविष्ठ गोष्टी असतील तर आमचा व्हीप महत्त्वाचा ठरणार. शिवसैनिकांसोबत जे एकनिष्ठ आमदार राहिलेले आहेत आम्ही त्यांच्यासोबत राहू’, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मध्यावधी निवडणुका लागण्याबाबतची भविष्यवाणी करण्यात आली. त्याचबाबतची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी देखील दिली. जे आमदार पळून गेले आहेत ते जर मध्यावधी निवडणुकांच्यामध्ये आमच्या समोर आले तर त्यासाठी देखील आम्ही तयार आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.