33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

टीम लय भारी

मुंबई : राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. घडणाऱ्या राजकीय घडामोडींना काहींनी समर्थन दिले आहे. तर काहींनी विरोध दर्शविला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्याच सहकाऱ्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्याबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. असेच सहानुभूतीपर पत्र मुंबईच्या माजी पोलीस अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले आहे.

माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र राज्य .

साहेब ,
जयभीम ! जय महाराष्ट्र !!

पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्या की , महाराष्ट्रीयन गुजराती सोडून उभा महाराष्ट्र आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आता महाराष्ट्रीयन गुजराती कोण ? तर देवेंद्र, अतुल, चंद्रकांत, आशिष, प्रवीण, प्रसाद अशा नावाची माणसं. ही माणसं महाराष्ट्राच्या मुळावर बसून दोन गुजरात्यांच भलं करायला निघालेली आहेत. स्वतःला अस्सल मराठी म्हणून घेणारी ही मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अशा अवलादी होत्या. महाराजांनी छाटून काढले अशा फितुरांना. असो. या मंडळींना महाराष्ट्र तोडायचा आहे. यासाठी कितीतरी हजारो कोटीचे डील झाले आहे, अशी जोरात चर्चा आहे.

आपल्या विरोधाचे मूळ कारण …
साहेब, आपण काही महिन्यापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ‘आरएसएस’वर टीका करीत होता. भाजप आणि विशेषतः “नागपूरचे” देवेंद्र फडणवीस यांना तर उघड उघड अंगावर घेत होतात. याचाच राग या दोघांनाही येत होता आणि त्यांनी तुमचा घात केला. तुम्ही कडव्या हिंदुत्वापासून प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाकडे जात असल्याचे पाहून त्यांचे पित्त खवळले आणि त्यांनी डाव टाकायला सुरुवात केली.

भाजप हा दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात आणि तो पक्ष संपविण्यात माहीर आहे. त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. त्यांना आपल्यापेक्षा कोणी मोठा झालेले पाहवतच नाही. सगळे आम्हालाच द्या. भसम्या रोगाने पिछाडलेली ही मंडळी आहेत. या त्यांच्या रोगामुळे राष्ट्राचे आणि राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु हे तथाकथित राष्ट्रभक्त जाणीवपूर्वक राष्ट्रविघातक खेळ करीत आहेत.

फोडलेले पक्ष …
महाराष्ट्रात राजू शेट्टींचा पक्ष फोडून त्या सदाभाऊ खोतला आपल्याकडे ओढला. गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्यावर इतका अन्याय की त्यांना पक्ष सोडायला मजबूर केले जात आहे. गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या मुलावर असाच अन्याय केला. जो पक्ष वाजपेयी आणि अडवाणी यांचा होऊ शकला नाही तो या बंडखोर येड्यागबाळ्यांचा काय होणार?

म. न. से. पक्ष फोडला …
साहेब तुम्हाला सांगतो तुमचा चुलत भाऊ राज ठाकरे यांचा पक्ष सुद्धा भाजपने फोडला. राज ठाकरेंना वैचारिक का काय ते बंड करायला सांगून त्यांना संपवून टाकले. ओव्हरस्मार्ट समजणाऱ्या राज ठाकरेंना हे अजूनही समजले नाही. मराठी या मुद्द्यावरून हिंदुत्व अशा गोल गोल पद्धतीने फिरवून त्यांचा पक्ष संपवून टाकला. आता राज ठाकरेंना आपण राष्ट्रीय नेते असल्याचा भास होऊ लागला आहे. परंतु त्यांचा पक्ष संपल्यात जमा आहे. राज ठाकरे संपूर्ण राज्य चालवू शकतात असा आमचा समज होता. पण आता ते दोन तीन तालुके सुद्धा चालवतील की नाही अशी शंका यायला लागली आहे .

शिवसेना पक्ष संपविण्याचा डाव…
साहेब, भाजपा अतिशय क्रूरपणे, कपटी चालीने महाराष्ट्रातून शिवसेना पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. नव्हे बऱ्यापैकी संपविला सुद्धा आहे. परंतु साहेब, तुम्ही घाबरू नका. आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं आपल्या सोबत आहेत.

वर्षा बंगला …
साहेब, आपण वर्षा बंगला सोडला आणि आपण राज्यातील लोकांना जिंकलत. बुद्धाच्या विचारसरणीनुसार आपण मोह सोडलात.

माफी नाही ….
साहेब, यापुढे सर्वसामान्य शिवसैनिकांची एक साधी अपेक्षा आहे की, या राक्षसी महत्वाकांक्षा असलेल्या बंडखोर लोकांना तुम्ही कधीही माफ करू नका. आदित्यच्या पिढीसाठी अतिशय नव्या दमाची शिवसेना आताच तयार करा.

आंबेडकरवादी ….
साहेब मी आंबेडकरवादी आहे. आपल्या पक्षाची वैचारिक भूमिका आम्हाला कधीच पटली नाही. परंतु आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्यासारख्या कित्येक आंबेडकरवाद्यांची मते बदलत आहेत. आपल्या प्रति स्नेहाची, प्रेमाची भावना तयार होत आहे. तुमचं प्रबोधनकारांचे हिंदुत्व आमच्या विचारांशी जवळीक साधणारं आहे.

मुस्लिम समाज …
साहेब, तुमच्या चांगल्या आणि सोज्वळ स्वभावामुळे मुस्लीम समाज सुध्दा आपल्या प्रति अतिशय चांगल्या भावना ठेवून आहे. ओवेसी बाबा काहीही म्हणोत. मराठी मुस्लिम आपल्याच बाजूने आहेत. हे कित्येक मुस्लिम मित्रांशी बोलल्यावर जाणवते. ते अब्दुल सत्तार भाईवर चिडून आहेत .

जिंकू किंवा हारू यापेक्षा काय ?…
साहेब, होऊन होऊन काय होईल? दोनच गोष्टी होतील. एक तर आपण जिंकू किंवा हारू. बाकी काय होणार ? त्यांचे राज्य जरी आले तरी ते दीड ते दोन वर्षाचे असेल. पाच वर्षे झाल्यानंतर निवडणुका होतीलच. त्यानंतर तुम्ही आहातच की. तुम्ही पवार साहेब आणि सोनिया मॅडमशी चांगले संबंध ठेवा. अजित पवार यांच्याशी बरे संबंध असले तरी चालतील. कारण बंडाच्या मागे कोणती शक्ती आहे याचा या हुशार राजकीय नेत्याला अजून शोधच लागला नाही. असो.

ईडी आणि कोर्ट ….
विधानभवनात मतदान झाल्यास आपण जिंकणार यात शंकाच नाही. फक्त ते सुप्रीम कोर्ट वगैरे वगैरे न्यायालयीन लढाईत काय होईल सांगता येत नाही. कारण ईडी आणि सध्याचे कोणतेही कोर्ट हे भाऊ भाऊ असल्यासारखेच वागायला लागले आहेत.

गृहखाते ….
साहेब, तुमचे सरकार चालू राहिलं तर त्या गृहखात्याकडे अतिशय गंभीरपणे लक्ष द्या. या खात्याचे महत्व किती आहे हे शरद पवार साहेबांना विचारा. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री पदासोबत गृहखाते आपल्याकडेच ठेवले. त्यांना या खात्याचे महत्व किती समजले हे लक्षात ठेवा तुम्ही. सध्या संघी अधिकाऱ्यांनी हे खातं पोखरलं आहे.

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ?…
सर्वसामान्य जनतेला माहीत नसतं की दररोज म्हणजे दररोज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील कायदा सुव्यवस्था व सद्य राजकीय घडामोडी बद्दल माहिती देतात. इतक्या मोठ्या बंडाची खबर या अधिकाऱ्यांना लागू नये ? काय करत होते हे अधिकारी ? शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. मागे आयपीएस रश्मी शुक्ला बाईंनी सरकार स्थापनेच्या वेळी काही लोकांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप केले होते. माहित आहे ना आपल्याला साहेब ?

भाजप आय टी सेल …
बऱ्याच दिवसापासून भाजप आणि भक्तांचा आयटी सेल तुमच्याविरोधात मोठ्या प्रमाणात उत्साहाने काम करतोय. तुम्हीसुद्धा तुमच्या आयटी सेलला जोरात कामाला लावा.

केंद्राची सुरक्षा …
गृहमंत्री अमित शहा हे सर्व बंडखोर आमदार व त्यांच्या नातेवाईकांना वाय झेड सुरक्षा देणार आहेत. ज्यांच्या प्रॉपरट्या ईडी ने जप्त केल्या, त्या प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांना सुद्धा केंद्रीय सुरक्षा मिळणार. किरीट सोमय्या यांच्यासाठी काव्यगत न्याय म्हणावा का याला ? त्यांच्या प्लॅनप्रमाणे ते बरोबर जात आहेत. परंतु येणाऱ्या निवडणुकीत ही वाय झेड सुरक्षा काही कामाची नसणार आहे. तिथे तुमचा कट्टर समर्थकच कामाला येणार आहे.

कळत नकळत झालेल्या चूका …
साहेब, तुमच्या कडून कळत नकळत झालेल्या चुका सुधारा. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ आणि वेळ द्या. त्यांच्याशी बोला. संजय राऊत यांच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभे रहा. तो एकटा माणूस संपूर्ण भाजपला पुरून उरला आहे. म्हणून भक्त भयंकर चिडून आहेत. संजयजी खरा मर्द मराठा आणि वाघ आहेत. त्यांचा पत्ता कट करायला समर्थक आणि बंडखोर सगळेच बसलेत. त्यांच्या विरोधात भाजपचा संपूर्ण आयटी सेल आणि भक्त तुटून पडतात.

राष्ट्रीय पाठिंबा…
साहेब, यावेळी न भूतो न भविष्यती असा राष्ट्रीय पाठिंबा तुमच्या आणि शिवसेनेच्या मागे भक्कमपणे उभा आहे. सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर आणि इतर सर्व अतिरथी महारथी तुमच्या पाठीशी आहेत. असे पूर्वी कधीही घडले नव्हते. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झाले आहे. तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. यावर्षी पंढरपूरच्या विठ्ठलाची आपणच सपत्नीक महापूजा करणार.

जयभीम ! जय महाराष्ट्र !! जय भारत !!!

आपल्यावर प्रेम करणारा आंबेडकरवादी ,

ऍड . विश्वास काश्यप,
माजी पोलीस अधिकारी,
मुंबई .

ताजा कलम :- एका कंपनीत ५०० कामगार होते . त्यातील ४५० कामगारांनी नोकरी सोडली . तर त्यांचा युनियन लीडर मालकाला म्हणतो की आता कंपनी माझ्या नावावर करा .

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ऍक्शन मोडमध्ये

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी