राज्यातील बळीराजा एका वेगळ्याच कारणामुळे चिंताग्रस्त झाला आहे. सध्या जनावरांमध्ये ‘लम्पी’ त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने आतापर्यंत अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव वाढल्याने तेथील प्रशासन सुद्धा खडबडून जागे झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या व्हायरसने थैमान घातले असून जनावरे दगावण्याची संख्या सुद्धा वाढल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून याबाबत वेळोवेळी आदेश काढत असून जनावरांची काळजी घेण्याबाबत सुद्धा सुचनावली जाहीर केली आहे. दरम्यान सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या व्हारसच्या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यासाठी आदेश काढले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीकडून एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे. या परिपत्रकात लम्पी प्रादुर्भावावर असे म्हटले आहे की, लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सोमवार दि. १२.०९.२०२२ पासून पुढील आदेश येईपर्यंत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजार (गाय, बैल, शेळी, मेंढी इत्यादी) बंद ठेवण्यात येणार आहे, असे समितीकडून सांगण्यात आले आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज प्रशासनास सहकार्य करावे असे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा…
Indian Cricket Team : राहुल द्रविडचे मोठे वक्तव्य, भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर केले भाष्य
Maharashtra Politics : मनसेला मिळणार मंत्रीपद, अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आशा पल्लवित !
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव राज्यात झपाट्याने वाढू लागला आहे. त्याची तीव्रता अधिक असल्याने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये खबरदारीची पावले उचलण्यात येत असून पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यात फार प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे जाणवू लागतात त्यावेळी जनावरे लंगडत चालतात, जनावरांची भूक काहीशी कमी होते. या तडाख्यात गायी सुद्धा सापडल्या आहेत परिणामी दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे.
यावर पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी कशी घ्याल याबाबत सुद्ध सांगण्यात आले आहे. जर कुठल्या जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले तर त्या जनावरापासून इतर जनावरांना दूर ठेवा. जनावरांच्या अंगावर गोमाशा बसणार नाहीत याची काळजी घ्या तसेच जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवा असे म्हणून जनावरांची काळजी घेण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
महिन्याभरापासून हा ‘लम्पी’ त्वचारोगाचा आजार जनावरांमध्ये वाढल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या आजाराची लागण माणसाला सुद्धा होऊ शकते असे सुद्धा निदर्शनास आले आहे, त्यामुळे भविष्यात हा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सुद्धा खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे.