शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेने कॉंग्रेससोबत युती केली असती का ? असा प्रश्न त्यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेनेतील तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार फुटून गेल्यानंतर शिवसेनेच्या राज्याच्या राजकारणाला मोठ्या प्रमाणात सुरुंग लागल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाकडे वाटचाल सुरु केली. त्यापैकी शिंदे गटात सहभागी झालेल्या माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवायला सुरुवात केलीय. आल्या दिवशी रामदास कदम ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्री वरती माध्यमांसमोर बोलत असतात.
यावेळी रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर शिवसेनेने कॉंग्रेससोबत युती केली असती का ? याचे उत्तर आधी आदित्य ठाकरे यांनी द्यावे, मग गद्दारांची व्याख्या ठरवावी. त्याचप्रमाणे मी पर्यावरण मंत्री असताना देखील माझ्या खात्याचा कारभार आदित्य ठाकरेचं करत होते अशी माहिती रामदास कदम यांच्याकडून देऊन खुलासा करण्यात आला आहे. शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी मी गुवाहाटीला असताना प्रयत्न केले पण तेव्हा मात्र ते शक्य झाले नाही आणि आता न्यायालयात लढाई चालू असल्याने ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येतील यावर बोलणे चुकीचे आहे, असेही त्यांनी त्यांच्या बोलण्यात नमूद केले.
हे सुद्धा वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ‘रविकांत वरपे’ यांनी दिले ‘रामदास कदमां’ना सडेतोड उत्तर
’उध्दव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडावी’ – रामदास कदम
एकनाथ शिंदेंची जादू कायम; रामदास कदमांचा राजीनामा
तसचं आज रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे आणि मातोश्रीला फ्रेन्डशीप डे च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे मंत्रीमंडळ विस्तारावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर खोचक टीका करणाऱ्या अजित दादांना नेहमी विरोधी पक्षनेता राहण्यासाठी शुभेच्छा देत कदमांनी टोला लगावला.
दरम्यान, रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर ते भावुक झाले होते. शिवसेनेत त्यांच्यावर घडलेल्या सर्व घटनेबाबत बोलले होते. वयाने लहान असलेल्या आदित्य ठाकरे यांना साहेब बोलावे लागते अशी खंत सुद्धा त्यावेळी रामदास कदम यांनी बोलून दाखविले होते.