टीम लय भारी
औरंगाबाद l महाराष्ट्राला हादरवणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृतांमध्ये एका ८ वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. तर ६ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक घटनेतून वाचलेल्या मुलाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलावर उपचार सुरू आहेत.
घरात घुसून कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने झाला हल्ला
पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात भल्या पहाटे हे हत्याकांड घडले. ही घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोराने संभाजी निवारे यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने भयानक हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, ८ वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सुदैवाने संभाजी निवारे यांचा सहा वर्षांचा मुलगा सोहम थोडक्यात बचावला आहे. मात्र, तो जखमी झाला आहे.
संभाजी निवारे यांच्या जवळच्या नात्यात लग्न होते. उशिरा रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. पहाटे शेजाऱ्यांना संभाजी निवारे यांच्या घराचे दार उघडले दिसले, घराचे दार उघडे दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता तिघांचे मृतदेह आढळून आले.
शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नासाठी संभाजी निवारे शुक्रवारी शहरातील बाजारात जाऊन मोठी खरेदी करुन आले होते. या मौल्यवान वस्तू लुटण्याच्या उद्देशाने हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकाच कुटुंबातील तिघांची का हत्या करण्यात आली, हत्येमागे हेतू काय आहे? संभाजी निवारे यांच्या कुटुंबीयाची हत्या केल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या हत्येमागच कारण काय याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.