30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रचित्रलेखाने घेतला निरोप; ज्ञानेश महारावांनी लिहिले, राम राम अमुचा घ्यावा!

चित्रलेखाने घेतला निरोप; ज्ञानेश महारावांनी लिहिले, राम राम अमुचा घ्यावा!

मराठीतील दर्जेदार मराठी वृत्तसाप्ताहिक चित्रलेखाने घेतला निरोप! आज, 16 डिसेंबर रोजी चित्रलेखाचा (Marathi Chitralekha) शेवटचा अंक प्रकाशित झाला आहे. संपादक ज्ञानेश महाराव यांनी “राम राम अमुचा घ्यावा,” हे संपादकीय लिहून मराठी वाचकांचा निरोप घेतला आहे. मराठी माध्यमजगतातील ही अत्यंत धक्कादायक आणि वाचकांच्या मनाला चटका लावणारी घडामोड आहे. भूमिका घेणारे, निर्भीड व स्वतंत्र बाण्याचे संपादक अशी महाराव यांनी ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्रभर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

‘साप्ताहिक चित्रलेखा’चा आज प्रकाशित झालेला 26 डिसेंबर 2022 पर्यंतच्या सप्ताहातील हा अंक म्हणजे मराठी पत्रकारितेतील साडेतेहतीस वर्षांच्या एका धगाधगत्या व कृतिशील प्रवासाला मिळालेला पूर्णविराम ठरला आहे. ‘चित्रलेखा’च्या पहिल्या अंकापासून सलग साडेतेहतीस वर्षं ज्ञानेश महाराव आणि ‘चित्रलेखा’ हे एक अतूट नाते होते.

“शेवटचा अंक: त्यांचा-आमचा” अशी संकल्पना घेऊन महाराव यांनी “राम राम अमुचाही घ्यावा,” असे संपादकीय लिहिले आहे. हे संपादकीय जसेच्या-तसे ‘लय भारी’च्या वाचकांसाठी –

‘चित्रलेखा’च्या पहिल्या अंकापासून सलग साडेतेहतीस वर्षं मी संपादन करतोय. त्याआधी सव्वाचार वर्ष मी ‘साप्ताहिक विवेक’मध्ये सहसंपादक होतो. ’विवेक’ हे ‘रा.स्व. संघा’चं मुखपत्र. तिथे चौकट नव्हती. पण पत्रकारितेला मर्यादा होत्या. याउलट स्थिती ‘चित्रलेखा’त. संपूर्ण मोकळेपणा. वयाच्या पंचविशीत पत्रकारितेत आलो. त्यानंतर 38 वर्षांचा प्रवास. माझी सेवानिवृत्तीच्या वयाची 60 वर्ष जून 2020 मध्ये पूर्ण झाली. तेव्हा लिहिलं होतं, ‘मॅरेथॉन धावलोय. मॅरेथॉन धावणारा शर्यत पूर्ण झाली तरी ‘कुल’ होण्यासाठी मैदानाला दोन-चार फेर्‍या मारतो. तसं माझंही होईल. पण कधी तरी थांबलं पाहिजे!” म्हणून थांबतोय.

खरं तर, ’चित्रलेखा’ला 2014 मध्ये 25 वर्ष पूर्ण झाली, तेव्हाच ‘चित्रलेखा’ मालकांना मी स्वेच्छानिवृत्ती बद्दल सांगितले होते. पण तेव्हाच त्यांनी ‘तुमच्यासारखा संपादक आणा आणि मोकळे व्हा’, असे सांगितले. शोधाशोध सुरू केली. काहींना तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना ‘चित्रलेखा’च्या कामाची माहिती आहे, तेही स्वत:हून संपादक पदाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येईनात. वृत्तपत्राच्या पुढे जाणारी ’न्यूज वीकली’ पत्रकारिता ही अधिक मेहनतीची आहे. तशी मेहनत घेतल्यामुळे ‘चित्रलेखा’चे अनेक रिपोर्ट-रिपोतार्ज हे मराठी प्रिंट-टीव्ही मीडियाच्या खूप आधी प्रकाशित झाले आहे. असो. हे किती दिवस करायचे? ते करण्यासाठी मला वजा करून स्वतःहून कुणी वेळीच पुढे आले असते, तर त्याकडे ‘संपादक’पदाची जबाबदारी नक्कीच सोपवली असती. आता ती वेळ गेली आहे.

अर्थात, ‘चित्रलेखा’ थांबणं हे केवळ माझ्या थांबण्याशी संबधित नाही. त्याला व्यावसायिक कारणंही आहेत. ही धंद्यातली कारणं पत्रकारितेचा धर्म चोखपणे पाळून संपवता येतात, असा माझा अनुभव आहे. म्हणूनच ‘चित्रलेखा’ गेली साडेतेहतीस वर्षे विनाखंड चालू राहिला.

‘कोरोना लॉकडाऊन’ काळातही ‘डिजिटल-चित्रलेखा’ लाखो वाचकांपर्यंत नियमित पोहोचत होता. दिवाळी-2020 मध्ये ‘छापील चित्रलेखा’ सुरू झाल्यानंतरच्या पाच-दहा अंकांनंतर मी ’चित्रलेखा’तून मोकळे होण्याचे निश्चित केले होते. पण ते परिस्थितीनुरूप लांबत राहिले. शेवटी या वर्षाच्या 15 ऑगस्टला वाचकांचा निरोप घेण्याचे निश्चित केले. पण त्यासाठी संचालकांनी दिवाळीचा मुहूर्त ठरवला. तोही हुकला तेव्हा हा 26 डिसेंबरचा अंक शेवटचा, हा माझा निर्णय पक्का ठरला. संचालक मनन कोटक यांची मी 2023 च्या ‘मार्च एंड’पर्यंत अंक काढावेत अशी इच्छा होती. ती मला मान्य नव्हती. सेवाकाळ संपल्यानंतर रेंगाळणं हे मनाला पटत नव्हते. परंतु, आपल्याबरोबर ‘चित्रलेखा’ही थांबणार, हे वास्तव अस्वस्थ करणारं होतं.

मराठी चित्रलेखा संपादक ज्ञानेश महाराव शेवटचा अग्रलेख
मराठी चित्रलेखा बंद होत आहे. संपादक ज्ञानेश महाराव यांनी लिहिलेला हा शेवटचा अग्रलेख.

अर्थात, ‘चित्रलेखा’ थांबणं हे केवळ माझ्या थांबण्याशी संबधित नाही. त्याला व्यावसायिक कारणंही आहेत. ही धंद्यातली कारणं पत्रकारितेचा धर्म चोखपणे पाळून संपवता येतात, असा माझा अनुभव आहे. म्हणूनच ‘चित्रलेखा’ गेली साडेतेहतीस वर्षे विनाखंड चालू राहिला.

‘चित्रलेखा’ने काय दिले, काय घडवले, हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. खूप माणसं, आणि घटना जवळून अनुभवल्यात. 1996 पासून सलग 26 वर्षं लिहीत असलेलं हे ‘आजकाल’ सदर तर बदलत्या महाराष्ट्राचा आणि बदलेल्या भारताचा इतिहास आहे. हेही सदर या शेवटच्या अंकासोबत थांबणार आहे. माझी लेखणी आणि वाणी कठोर असेल; पण ती कधीच मतलबी नव्हती आणि नाही. ज्याला त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीच ती कठोर झाली आहे. काही वेळा अनावधानाने कुणी दुखावलं गेलंही असेल. इथे एक दंतकथा आठवते.

हेसुद्धा वाचा :

अभिजित कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

Arnab Goswami : भारतीय पत्रकारितेला चिटकलेला ‘कोरोना’

लय भारीचा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी अभ्यास पुस्तक, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

एका शिपायाचा काही कारणाने असेल वा नसेल, राजाच्या अंगरख्यावर पाय पडला. त्याच वेळी राजा उठला आणि अंगरखा फाटला. फार मोठा अपराध झाला होता. पण राजा शिपायाकडे नुसतंच जरबेनं बघत निघून गेला. पुढे कुठल्या तरी युद्धात हाच शिपाई राजा पुढं उभा राहिला. म्हणाला, ‘ओळखलंत का? मी तो अंगरख्यावर पाय दिलेला. माझ्यावर लक्ष ठेवा!’ असं म्हणून तो शिपाई शत्रूच्या गर्दीत घुसला. सपासप तलवार चालवत पुन्हा दौडत राजापुढे आला आणि मुजरा करून म्हणाला, ‘माझ्यावर लक्ष ठेवा!’ पुन्हा शत्रूच्या फळीत घुसला. तलवार चालवून पुन्हा वेगाने परतला. पुन्हा तेच म्हणाला, ‘माझ्यावर लक्ष ठेवा, मीच तो अंगरख्यावर पाय दिलेला!’ पुन्हा तडफेने शत्रूच्या गर्दीत घुसला. रक्तबंबाळ होऊन परतला आणि राजा पुढे उभा राहिला. तो तेच बोलण्याआधी राजा त्याला थोपटत म्हणाला, ”असं जीवावर उदार होणारं साहस आता पुरे झालं. अरे, माझा अंगरखा फाटलेला असेल, पण मन फाटलेलं नाही!” असे मनाचे राजे 38 वर्षांच्या पत्रकारितेत मला असंख्य लाभले. म्हणूनच मराठी स्वाभिमानावर हल्ला करणाऱ्या विरोधात माझी लेखणी तुटून पडू शकली. त्याला ‘चित्रलेखा’ व्यवस्थापनाची, संपादकीय व अन्य विभागातल्या सहकाऱ्यांची, गावोगावच्या पत्रकार- फोटोग्राफर, व्यंगचित्रकारांची भरभरून साथ मिळाली. वाचक म्हणून तुमचे आभार मानण्याऐवजी कृतज्ञतापूर्वक तुमच्या चरणावर माथा ठेवतो!

जय महाराष्ट्र! जय हिंद!

Marathi Chitralekha closed Dnyanesh Maharao
चित्रलेखा व्यवस्थापनाची बंदबाबत सूचना (प्रकाशक : मौलिक कोटक)

चित्रलेखाने घेतला निरोप, चित्रलेखाचा शेवटचा अंक, संपादक ज्ञानेश महाराव,

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी