कोकणचा विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, असेच प्रकल्प आम्हाला हवे आहेत. बारसू प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास भविष्यात आणखी धोकादायक प्रकल्प उभे राहून कोकणच्या प्रदूषणात वाढ होईल. त्यामुळे बारसू रिफायनरीविरोधात आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढा देऊ, असा निर्धार या आंदोलनाचे नेते सत्यजीत चव्हाण यांनी व्यक्त केला.
रिफायनरीमुळे आजूबाजूच्या पाच गावांमधील लोकांना त्रास होणार असल्याने या स्थानिकांनीच आंदोलन सुरु केले असून त्यामध्ये बाहेरून कोणीही आले नसल्याचा दावा त्यांनी केला. कोकणच्या विकासाचे मॉडेल आमच्याच म्हणण्यानुसार चर्चेत मांडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन पेटल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून सौम्य लाठीमार केला होता. खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेतले होते. आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली होती.
रविवारी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सत्यजीत चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीच्यावेळी सत्यजीत चव्हाण यांच्या शिष्टमंडळासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड होते. शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत बारसू रिफायनरीच्या परिसरातील स्थानिकांच्या समस्यांबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात बाहेरच्या लोकांचा समावेश असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला दावा चव्हाण यांनी फेटाळून लावला.
मनुकुमार श्रीवास्तव कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता, स्थितप्रज्ञता, सहनशीलता,अन् संयमाची शांत मूर्ती..!
मिशी कधी काढणार? आमदार संतोष बांगर यांना जयंत पाटलांची विचारणा
जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो ; मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचे मार्मिक उत्तर
बारसू प्रकल्पाचे सुरु असलेले माती सर्वेक्षण ताबडतोब थांबवून त्याठिकाणी तैनात असलेला पोलिसांचा फौजफाटा मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी स्थानिक लोकांची सुरु केलेली दडपशाही जोपर्यंत थांबविली जात नाही, तोपर्यंत आम्ही राज्यसरकारसोबत चर्चा करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कोकणच्या निसर्गसंपन्न पर्यावरणाला हानी पोहचविणाऱ्या कुठल्याही प्रकल्पाला आम्ही मंजुरी घेऊ देणार नाही. कोकणच्या विकासाचे मॉडेल आमच्या म्हणण्यानुसारच सरकारसोबतच्या चर्चेत मांडले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.