राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती (Rajarshi Shahu Maharaj Foreign Education Scholarship) या योजनेतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले आहे.(Supriya Sule’s letter to Eknath Shinde!)
युरोपसह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही जण संशोधन क्षेत्रातही कार्यरत आहेत. अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती ही योजना राबविण्यात येते. या योजनेमध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची पूर्ण शिक्षण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क शिष्यवृत्तीधारकांना मिळते. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून तसा प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी दर ६ महिन्यांसाठी सादर करणे आवश्यक आहे. परंतु या योजनेत निवड झालेले विद्यार्थी हे पहिल्यांदाच परदेशात गेलेले असतात. त्यांना तेथील भौगोलिक परिस्थिती, वातावरण यांच्याशी एकरूप होण्यास वेळ लागतो. घरापासून दूर असल्यामुळे आजारपण व नव्या भाषेचेही मोठे दडपण त्यांच्यावर असते. याशिवाय जेवढा भत्ता या शिष्यवृत्तीद्वारे त्यांना मिळतो त्यामध्ये काटेकोरपणे त्यांना आपला खर्च भागवावा लागतो, अशा अनेक बाबी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
हे विद्यार्थी अनेकदा परिस्थितीशी जुळवून घेत तेथे शिक्षण घेतात. यामुळे अनेकदा हे विद्यार्थी एक किंवा दोन विषयामध्ये अनुत्तीर्ण होऊ शकतात. अशावेळी विद्यार्थ्यांची शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती व निर्वाहभत्ता बंद केला जातो या शासकीय नियमातील त्रुटीवर सुप्रियाताईंनी लक्ष वेधले आहे.
हे सुद्धा वाचा : खासदारांच्या संपत्तीत कोट्यानुकोटीची उड्डाणे; सुप्रिया सुळेंची संपत्ती किती वाढली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरली आंगणेवाडीच्या भराडी देवीची ओटी; जनतेला सुखी ठेवण्याचे घातले साकडे
या विद्यार्थ्यांवर परदेशात आपला खर्च भागविण्यासाठी अतिशय कठिण परिस्थितीत पडेल ते काम करण्याची वेळ ओढावते. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर देखील होतो. हे लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा, अशी विनंतीही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रात केली आहे.