टीम लय भारी
मुंबई : शिवसेना पक्षातून बाहेर पडलेल्या आणि बंडखोरी केलेल्या आमदारांकडून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न सुरु आहे. पण या गोष्टींकडे लक्ष न देता सरकारमधील काही मंत्र्यांकडून लोकांची कामे करण्यावर भर दिला जात आहे. बंडखोर आमदार सरकार पडण्याच्या तयारीत असले तरी, आघडीमधील मंत्री जनतेच्या कामासाठी याकडे काहीवेळासाठी का असेना पण दुर्लक्ष करत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला पाण्याची कमतरता भासू नये, याकरीता कृष्णा-मराठवाडा योजनेंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. ३ अंतर्गत निविदा काढण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे आष्टी-कडा तालुक्यातील ८१४७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
सदर प्रकल्पाचा आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. पण शनिवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत निर्णय देऊन दुष्काळी भागातील गावांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेमुळे खुंटेफळ तलावात ७२.३३ किमीच्या बंद पाईपलाईनद्वारे १.६८ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.
याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या उपसा सिंचन योजनेच्या ७६६.०९ कोटी रुपये किंमतीची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे सिना नदीवरील अस्तित्वात असलेल्या को.प बंधाऱ्यातून २.५९ टीएमसी पाणी दोन टप्प्यात उचलण्यात येणार आहे. या योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील आवर्षण प्रवण माढा व बार्शी तालुक्यातील १५००० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
कृष्णा-मराठवाडा योजनेंतर्गत उपसा सिंचन योजना क्र. ३ ही पुढील दोन वर्षात पूर्ण करण्याच्या प्रयाण करण्यात येणार आहे. तसेच, हि योजना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील जलसंपदा विभागातील अभियांत्रिकेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे सिद्ध होईल, असे मंत्री जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा :
बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतेय, राष्ट्रवादीने केली ईडीकडे तक्रार !
गुवाहाटीतून सुरतमध्ये ‘रात्रीस खेळ‘चाले
‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’