टीम लय भारी
मुंबई : विविध समस्या, तक्रारी, अडचणी घेऊन सामान्य जनता मंत्र्यांना भेटण्यासाठी येतात. परंतु कोरोना व्हायरसमुळे विधानभवनाच्या आत कोणत्याही व्यक्तीला सोडले जात नाही. त्यासाठीचे पासेस बंद केले आहेत. पण समस्याग्रस्त जनतेचे म्हणणे ऐकून घेतलेच पाहिजे, असा विचार करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील चक्क विधानभवनातून बाहेर आले. त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ अक्षरश: रस्त्यावर उभे राहून लोकांची निवेदने घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
राज्याच्या विविध भागातून अनेकजण जयंत पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. यात महिला, पुरूष, कार्यकर्ते यांचा समावेश होता. साधारण 15 जण असतील. या लोकांना न भेटताच परत पाठविणे योग्य ठरणार नाही. असा विचार करून जयंत पाटील विधानभवनाबाहेर आले, आणि या सगळ्यांसाठी तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दिला. लोकांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले.
मंत्रीपदाच्या खुर्चीमुळे यथेच्छ अधिकार व सोयी सुविधा उपभोगता येतात. सरकारी खर्चाने मिरवता येते. पण ही खूर्ची सामान्य लोकांसाठी आहे. त्यामुळे खुर्चीचा उपयोग जनतेसाठीच झाला पाहीजे याची जाणीव अनेक मंत्र्यांना राहात नाही. मंत्रीपदाची खूर्ची मिळाली की, लगेच डोक्यात हवा जाते. परंतु आपली बांधिलकी सामान्य लोकांशी आहे. सामान्य लोकांमुळेच खुर्ची मिळाली आहे हा संदेश पाटील यांनी आपल्या वागण्यातून दिला. पाटील यांचा हा विनम्रपणा विधानभवन परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेक नागरिक आपले प्रश्न, समस्या घेऊन येत असतात. मात्र #coronavirus च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विधिमंडळाच्या दैनंदिन प्रवेशिका बंद केल्या आहेत. राज्यभरातील नागरिक अपेक्षा घेऊन येत असतात, ते हताश होऊ नये यासाठी विधानभवनाच्या बाहेर जाऊन त्यांची भेट घेतली. pic.twitter.com/24Z2Oc0xNq
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 13, 2020
दरम्यान, कोरोनामुळे लोकांनी प्रवास टाळावा. ग्रामीण भागातील जनतेने फारच महत्वाच्या कामाशिवाय मुंबईमध्ये येऊ नये. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी काळजी घ्या, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा
उद्धव ठाकरे, जयंत पाटील रमणार बालपणीच्या शाळेत
बच्चू कडू यांच्या कार्यालयातील अधिकारी सुद्धा ‘कडू’च
उद्धव ठाकरे, अजितदादांचा देवेंद्र फडणवीसांना झटका; महत्वाचा ‘जीआर’ केला जारी