हिंदू धर्मविरोधात गरळ ओकणाऱ्या अंनिसवर महाराष्ट्रात बंदी आणण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या राज्य कार्यकारीणी सदस्य प्रदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. अनिसच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. दरम्यान या मागणीच्या अर्जाला गती मिळाली असून तो अर्ज राज्याच्या गृहविभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे. (Pradeep Naik allegations to ANS erasure of Hinduism)
अनिस केवळ हिंदू धर्माला लक्ष्य करण्याचे काम करीत आहे. इतर धर्मांतील वाईट चालीरीतींवर ते टीका का करीत नाहीत. कुठल्यातरी नदीवर नेऊन त्या नदीतील पाणी शिंपडून तुम्ही पवित्र झाल्याच्या भूलथापा ख्रिश्चन धर्मातील पाद्री मारत असतात. अशा पाद्रींविरोधात अनिस आवाज का उठवीत नाहीत? असा सवाल प्रदीप नाईक यांनी विचारला आहे. मशिदीत महिलांना अद्यापही प्रवेश दिला जात नाही. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना देखील मशिदीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. त्याविरोधात अनिस का बोलत नाही? फक्त हिंदू धर्मालाच का ‘टार्गेट’ केले जात आहे?
निवेदनात प्रदीप नाईक यांनी म्हटले आहे की, अंनिस ही संस्था स्थापनेपासून हिंदू देवी-देवतांना विरोध करण्याचे काम करत आहे. हिंदूच्या मंदिरांना व उत्सवांना कायम लक्ष्य केले जाते. अंनिस ही अंधश्रद्धा नाही तर हिंदू धर्म मिटवण्याच्या मागे लागली आहे. कारण अंधश्रद्धा केवळ हिंदू धर्मात नाही तर ती इतर धर्मात देखील आहे. मात्र अंनिस कधीही कोणत्याही मौलवी किंवा फादर, पोप यांना चॅलेंज करत नाही.
यापुढेही जोपर्यंत अंनिसवर बंदी येत नाही तोवर मी पाठपुरावा करत राहणार आहे. त्यांनी त्यांची हिंदू विरोधी धोरणे बदलली पाहिजेत. तेव्हांच मी माझा लढा थांबवेन. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हिंदू विरोधी कारवाई करण्यासाठी वित्तपुरवठा केला जात आहे का, समितीचे नेमके काम काय, इतर धर्मांच्या बाबतीत जागृतता का दाखवली जात नाही याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा:
वर्तणुकीतील तफावतीने भरलेल्या समाजाला दिशा देण्याची गरज – प्रा. प्रविण बांदेकर
अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका