देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेली काँग्रेस पार्टी प्रथमच बदललेली दिसत आहे. पक्षाच्या दृष्टिकोनाही मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. (Congress Changed) काँग्रेसने आता नेहरूंबरोबरच आंबेडकर, बोस यांनाही स्थान दिले आहे. पक्षात खर्गे तर सोनियांपेक्षाही मोठे झालेले पाहायला मिळत आहेत. सातत्याने घराणेशाहीच्या आरोपाच्या गर्तेत अडकलेल्या काँग्रेसमध्ये हा मोठा चमत्कारच घडून आला आहे.
काँग्रेस पक्षामध्ये हे सारे बदल घडत आहेत ते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार. भारत जोडो यात्रेतून संपूर्ण देशाची भ्रमंती करतानाच त्यांनी लोकांचे काँग्रेसबद्दलचे आक्षेप, अपेक्षा, मते-मतांतरे सारे काही जाणून घेतले आहे. त्यानुसार आता पक्षाच्या धोरणातही मोठे बदल होताना दिसू लागले आहेत. छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेस पक्षाचे 85वे महाअधिवेशन होत आहे. त्यासाठी देशातील या 100 वर्षांहून अधिक जुन्या राजकीय पक्षाने जारी केलेल्या जाहिरातीने अनेकांना धक्का बसला आहे.
काँग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचे आरोप होतात. आजवर फक्त नेहरू-इंदिरा यांचाच वापर पक्षात केला जातो, अशीही टीका होत होती. काँग्रेसने आजपर्यंत सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या व्यक्तिमतत्त्वांना पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात, मेळावे-अधिवेशनात फारसे स्थान दिलेले दिसत नव्हते. मात्र, आजच्या रायपूर महाअधिवेशन जाहिरातीत बोस, डॉ. आंबेडकर यांच्या छायाचित्रांना प्रथमच महत्त्वाचे स्थान दिले गेल्याचे दिसत आहे.
याशिवाय, या जाहिरातीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या छायाचित्रांचा आकार सोनिया आणि राहुल गांधी यांच्यापेक्षाही मोठा दाखवला गेला आहे. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. नेहरू-गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला जाहिरात व प्रचार साहित्यात प्रथमच सर्वात मोठे स्थान दिले गेले आहे. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसचे हे नवे व्होटर जोडो सोशल इंजिनिअरिंग मानले जात आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातील वादामुळे सुभाषचंद्र बोस यांच्या अनुषंगाने नेहरू-गांधी कुटुंबाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत. काँग्रेसने कधीही खुल्या मनाने सुभाषचंद्र बोस यांना आपले मानले नाही, असा आरोपही होतो. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने ही संधी साधून बोस यांना काँग्रेसकडून पळविण्याचा प्रयत्न केला. सुभाषबाबूंचा गौरव करताना भाजपने त्यांच्याकडे काँग्रेसने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला. या विषयांवरून काँग्रेसला गोत्यात आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होतो. मोदीही स्वत: त्यात आघाडीवर आहेत.
हे सुद्धा वाचा :
- राहुल गांधी म्हणाले, RSS-BJPवाले माझे गुरु; भारत जोडो यात्रा यशस्वी केल्याबद्दल मानले भाजप, संघाचे आभार !
- राहुल गांधींना थंडी का वाजत नाही?
- महामोर्चात राज्यपाल रावणाच्या रूपात!
भाजपने सुभाषचंद्र बोस यांना पळविण्याचा प्रयत्न केल्याचा पडसाद बोस यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या बंगालमध्येही उमटले होते. त्यातच पंतप्रधान मोदींनी स्वत: नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. भाजपने सरदार पटेल यांच्याप्रमाणे आणखी एका स्वातंत्र्यसेनानीला पळविण्याचा प्रयत्न केल्याने आता काँग्रेसलाही आपली रणनीती बदलावी लागली आहे. त्यामुळे त्यांनी प्रथमच या नेत्यांना आपल्या जाहिरातीत मानाचे स्थान दिलेले दिसत आहे.