राज्यात अनेक दिवसांपासून सत्ता संघर्षावरून वाद निर्माण होत आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपशी युती केली आहे. अशातच हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक हे अधिवेशनाला आले होते. यावर मलिक हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये जाऊन मिसळण्याचा प्रयत्न केला. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नये, त्यांच्यावर आरोप असल्याचं पत्राद्वारे सांगितलं आहे. यावरून राजकारणाला वेगळा रंग प्राप्त होऊ लागला आहे.
नवाब मलिक येताच राज्याच्या राजकारणाला रंग प्राप्त झाला आहे. नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आले होते. त्यांच्यावर देशद्रोही असा आरोप असल्याने महायुतीत सामिल करू नये, असे भाजप आणि फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपचं ऐकत अजित पवार गटाने आपल्या पक्षातून नवाब मलिकांना दूर केलं की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबतची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिली आहे.
एवढे जुने सहकारी असूनदेखील तुम्ही हे बोलू शकत नाही आहात की राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरणात नवाब मलिक यांना अडकवलं गेलंय आणि तेही त्यांच्याकडून ज्यांच्या मांडीला मांडू लावून आता तुम्ही सरकारमध्ये बसलायत.
आमच्यादृष्टिनी नवाब मलिक निर्दोष आहेत आणि हे म्हणायची आमच्यात हिंमत आहे https://t.co/H0TsYfNf2p— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2023
हे ही वाचा
अजित पवार सिंचन घोटाळा फेम; फडणवीसांच्या पत्रावर राऊत आक्रमक
आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन प्रकरणी होणार चौकशी
‘जितेंद्र आव्हाड राजकारणातले राखी सावंत’
काय म्हणाले सुनिल तटकरे?
नवाब मलिक हे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. मधल्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असताना जे काही घडलं होतं, त्याचा काही संबंध नाही. आजारपणानंतर जामीन मिळाल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट झाली. आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकाऱ्यांशी भेट घेणं हे स्वाभाविक आहे असे तटकरे म्हणाले, यावरून लक्षात येतं की, सुनिल तटकरेंनी देखील मलिक यांना राष्ट्रवादी पक्षातून दूर ठेवल्याचं अप्रत्यक्षरीत्या सांगितलं आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत चांगलंच सुनावलं आहे. यावर आव्हाडांनी सुनिल तटकरेंवर टीका केली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
नवाब मलिक हे अनेक वर्षांपासून सहकारी असल्याचं सुनिल तटकरे म्हणाले आहेत. यावर आव्हाडांनी एवढे जुने सहकारी असूनही तुम्ही हे बोलू शकत नाही. राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरणात नवाब मलिक यांना त्यांच्याकडून अडकवलं आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसलात. आमच्यादृष्टिने नवाब मलिक निर्दोष आहेत आणि हे म्हणायची आमच्यात हिंमत आहे, असे म्हणत आव्हाडांनी सुनिल तटकरेंवर सडकून टीका केली आहे.