33 C
Mumbai
Saturday, June 1, 2024
Homeराजकीयटोलविरोधात राज ठाकरेंची भूमिका मवाळ?

टोलविरोधात राज ठाकरेंची भूमिका मवाळ?

टोलदरवाढीवरून राज ठाकरेंनी उपसलेली तलवार म्यान झाली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण चार दिवसांपूर्वी टोलनाके जाळून टाकण्याची भाषा करणारे तसेच टोल म्हणजे राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज ‘राज्य चालवायचे असले तर रेव्हन्यू लागतो’, अशी मवाळ भूमिका घेतलेली दिसली. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यातल्या सगळ्या टोलवर चारचाकी तसेच छोट्या गाड्यांना आम्ही मुक्ती दिली’ हे वक्तव्य करण्यामागचे कारण काय होते आणि त्यावरून आक्रमक झालेल्या मनसेने टोलनाक्यांवरील सुविधांचा विषय लावून धरल्याने टोलमुक्त महाराष्ट्राचा मुद्दा बहुधा मागे पडणार असल्याचे दिसते.

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांनी १ ऑक्टोबरपासून दरवाढ केल्यानंतर मनसे आक्रमक झाली. मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी चार दिवस ठाणे टोलनाक्यावर उपोषण केले. त्याची दखल सरकारने न घेतल्याने खुद्द राज ठाकरे ठाण्यात गेले आणि अविनाश जाधव यांना उपोषण सोडायला लावून आपण चार दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे स्पष्ट केले. त्यानंतर राज ठाकरेंनी काल (१२ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. आणि टोलसंदर्भात अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेचा दुसरा अंक आज राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर झाला. मंत्री दादा भुसे यांच्याशी राज ठाकरेंनी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली आणि कालचे मुद्दे विस्तृतपणे मांडले.

इशाऱ्याचे काय झाले?

आता प्रश्न उपस्थित होतोय की, रोड टॅक्स घेता तर टोलवसुली का करता, हा राज ठाकरेंचा मुख्य मुद्दा होता. पेडर रोडच्या नसलेल्या फ्लायओव्हरसाठी टोल वसूल केला जातोय, हाही राज ठाकरेंचा मुद्दा होता. टाेलचा पैसा जातो कुठे? असा सवाल करत चारचाकी गाड्यांकडून सरकारने टोल घेऊ नये, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. आणि जर यावर सरकार अंमलबजावणी करत नसेल तर आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशाराही राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला होता.

पण आजच्या पत्रकार परिषदेत ‘सरकार चालवायला रेव्हेन्यू लागतो’, असे वक्तव्य करून राज ठाकरेंनी टोलविरोधी मोहीम मवाळ केल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. बहुतांश टोलनाक्यांसाठी २०२६ पर्यंत करार झाले आहेत. त्यामुळे काही करू शकत नाही, असे राज ठाकरे आज म्हणालेत. हे त्यांना आधीही ठावूक होते. तरीही टोलनाके जाळून टाकण्याची भाषा त्यांनी का केली, हा प्रश्न आहेच.

विनाटोल खरंच शक्य?

यलो लाईनच्या 200 मीटर अंतरावरील सर्व वाहने विनाटोल सोडली जाणार म्हणजे 4 मिनिटांच्या पुढे एकही गाडी टोलनाक्यावर थांबणार नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. प्रत्यक्षात गाडी टोलनाक्यावरून पुढे गेली की, फास्टॅगमधून आपोआप टोल वसुली होते. गणेशोत्सवात सरकारने टोलमाफीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात गाडी टोलनाक्यावरून जाताना टोल कापला गेल्याची भाविकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे फास्टॅगमधून टोल वसुली होणार नाही, यासाठी कोणती उपाययोजना करणार, हे महत्त्वाचे आहे.

…तर ४४ टोलनाके बंद होणार

यात जमेची बाजू ही, की सार्वजनिक बांधकाम खात्याचे २९ आणि एम.एस.आर.डी.सी.चे १५ जुने टोलनाके बंद करण्याची राज ठाकरेंची मागणी आहे. आणि सरकार त्यावर एक महिन्यात निर्णय घेणार आहे. शिवाय मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे तसेच मुंबईतील राजीव गांधी सीलिंक पुलावरील टोलवसुली संदर्भात कॅगकडून ऑडिट करण्याची महत्त्वाची मागणी राज ठाकरेंनी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास आणि कॅगकडून ऑडिट झाल्यास अनेक बाबी समोर येतील. दरम्यान, ठाण्याच्या टोलनाक्याने केलेल्या दरवाढीसंदर्भातही सरकार एक महिन्यात निर्णय घेणार आहे. ठाण्याप्रमाणेत मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांनी केलेल्या दरवाढीबाबत सरकारचे हेच धोरण असणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यातही पारदर्शकता येणे गरजेचे आहे.

हे ही वाचा

टोलनाक्यांच्या सुविधांवरून राज ठाकरे आक्रमक

पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांचे कान टोचले!

मेट्रो कारडेपो कांजूरमार्गमध्येच, मग आम्हाला विरोध का केला? आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी