घर म्हटले की, भांडयाला भांडे लागणारच अशी म्हण आहे. तशीच काहीशी परिस्थिती राजकीय पक्षांची देखील असते. पक्षांतर्गत अनेक नेत्यांमध्ये नाराजी असते. ती वेळीच घालवणे हे कुटुंब प्रमुखाप्रमाणे पक्षप्रमुखाचे काम असते. योग्य वेळी मानातील राग, रुसवे, गैरसमज काढले की, पक्षात फुट पडत नाही. याचे गमक शरद पवार (Sharad Pawar) यांना चांगलेच उलगडले आहे. त्यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील गैरसमज दूर केले. दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिषदेमध्ये ते मतभेद प्रकर्षाने जाणवले. कारण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची संधी दिल्यामुळे अजित पवार नाराज झाले हाेते.
ते दोन वेळा बाहरे उठून गेले. एकदा सुप्रिया सुळेंनी त्यांना बोलावून आणले अशी मीडियामधे चर्चा होती. परंतु आपण नाराज नसल्याचे अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन शरद पवार यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांचे मनोमिलन केले. या बैठकीला दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी त्यांनी समजूत काढल्याचे समजते. सुमारे 15 मिनीटे ही बैठक सुरू होती.
हे सुद्धा वाचा
Nilu Phule : सुपरस्टार निळू फुले यांचा बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर
Fever : तापाची साथ आल्यामुळे पाँडेचेरीमधील शाळा आठ दिवस बंद राहणार
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. तसेच ते विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे पक्षामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक पक्षात काही ना काही कुरबुरी होत असतात. त्या वेळीच मिटवणे गरजेचे असते. कारण शिवसेनेतून फूट पडलेल्या शिंदे गटातील प्रत्येक आमदार नाराज असल्याचे सांगतो. तसेच बंडखोरीचे खापर हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर फोडतो. त्यामुळे वेळीच दुरुस्ती केली तर अशी वेळ येणार नाही. प्रत्येक पक्षप्रमुखाने काळजी घेणे गरजे आहे.