लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना, भाजप व मित्रपक्ष एकत्रितपणे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते. आमच्या महायुतीला जनतेला कौल दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. मात्र शिवसेना सोबत यायला तयार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन करण्याची मानसिकता शिवसेनेची झाली आहे. जनतेच्या जनादेशाचा अपमान करून शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाणार असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते राज्यपालांना भेटले. या भेटीनंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वाधिक आमदार भाजपचे असल्याने राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आम्हाला निमंत्रित केले होते. पण महायुतीमधील घटक पक्ष असलेला शिवसेना आमच्यासोबत येत नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.