राजेंच्या भूमिकेला मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचा विरोध
१० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
टीम लय भारी
सातारा : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मराठा समाजातच विसंवाद असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांत (EWS) समावेश न करण्याबाबतची खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी विरोध केला आहे. साता-यात ते बोलत होते.
दोन्ही छत्रपतींनी मराठा समाजाचे नेतृत्व करू नये
संभाजीराजेंनी EWS मध्ये अनेक जाचक अटी असल्याचे सांगत मराठा समाजाला त्याअंतर्गत आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पण आता मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांना संभाजीराजेंची ही भूमिका मान्य नसल्याचे म्हटले आहे. पाटील म्हणाले की, संभाजी महाराज हे राजे आहेत. ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्यापूर्वी सर्व संघटनांची बैठक घेऊन सर्वांची मते घ्यायला पाहिजे होते. काही संघटनांचे ऐकून त्यांनी ही चुकीची भूमिका घेतली आहे. उदयनराजे असोत किंवा संभाजीराजे असोत, ते मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष देतात तिथपर्यंत ठिक आहे. पण नेतृत्व करू नये.
छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करू नये असे सामान्य मराठा म्हणून मला वाटते. राजे मराठा आरक्षणात भाग घेतात तिथपर्यंत ठीक आहे, जर मराठा समाजाचे नेतृत्व एखाद्या राजाकडे गेले, तर धनगर समाज, ओबीसी, भटकेविमुक्त, इतर समाज आले तर त्यांचेही नेतृत्व त्यांना करावे लागेल, प्रत्येक संघटना आपापल्या समाजाचे प्रश्न मांडत असतात, राजांनी कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व समाजाचे नेतृत्व राजे म्हणून ते करत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका योग्य आहे. तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही पार पाडत आहोत, असे मत सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
१० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
EWS चा मराठा समाजाला फायदा करुन घेतला पाहिजे असा ठराव गोलमेज परिषदेत पास करुन घेतला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती कोर्टाकडून उठत नाही, तोपर्यंत फायदा मिळाला पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली. याबाबत सुरेश पाटील म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षणात कोणत्याही समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती असल्याने समाज आरक्षणापासून वंचित आहे. मराठा समाजासमोरील ताट काढून घेतले आहे. त्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे.
येत्या १० ऑक्टोबर रोजी मराठा गोलमेज परिषदेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच १० तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद राहणार आहे यासाठी राज्यभरात दौरा सुरु आहे. EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा आणि समाजातील तरुणांवर दाखल झालेले बोगस गुन्हे रद्द करा. या तीन गोष्टी सरकारने मान्य केल्या तर कदाचित १० तारखेच्या बंदवर विचार करू अन्यथा १० तारखेला राज्यभरात बंद पाळला जाईल. हा कडकडीत बंद होण्यासाठी समाजात जाणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.
मराठा संघटना आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले?
मराठा आरक्षणाचा प्रश्नावर खासदार संभाजीराजे, नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरूपात ईडब्लूएसच्या सवलती आणि आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ईडब्लूएसचे आरक्षण एका विशिष्ट समाजाला देता येत नाहीत. असे आरक्षण दिल्यास पुन्हा त्यावर न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. शिवाय, ईडब्लूएसच्या जाचक अटी मराठा समाजाला मान्य नाहीत. मागासवर्ग आयोगाने समाजिक मागासलेपणा सिद्ध केल्याने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातूनच आरक्षण मिळणे न्यायसंगत असल्याचे संभाजीराजे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. दहा टक्के ईडब्लूएसच्या समावेशामुळे मराठा समाजाच्या मुळ आरक्षणाचा लढा न्यायालयात कमकुवत होण्याची शक्यता मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यांनी याची दखल घेऊन हा निर्णय मागे घेण्याबाबत सुधारित आदेश जारी करण्याचे आश्वासन दिल्याचे संभाजीराजे म्हणाले.