‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने
इंदिरा गांधींच्या कार्यकाळाचा आढावा घेताना म्हटले होते(Indira Gandhi as the Iron Lady of India).
इंदिरा गांधी यांचीपंतप्रधान म्हणून कारकीर्द १९६७ ते १९७७ आणि १९८० ते १९८४ अशी होती. या
काळात इंदिरा गांधी यांनी घेतलेले अनेक निर्णय हे अतिशय धाडसी होते. त्याच बरोबर
तत्कालीन परिस्थितीच्या विपरीत होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. विशेषत:
इंदिरा गांधींच्या कार्यकालात त्यांना स्थानिक राजकारणाऐवजी आंतरराष्ट्रीय राजकारणात
आपला आणि भारताच्या मुत्सेद्दीगिरीचा ठसा उमटवता आला. कदाचित पंडित नेहरूंच्या
सानिध्यात राहून केलेली जगभराची भ्रमंती आणि शिक्षणाच्या निमित्ताने त्यांनी
अनुभवलेला जागतिक पातळीवर बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था
याचा देखील परिणाम निश्चितच त्यांच्यावर झालेला होता आणि तो त्यांच्या
व्यक्तिमत्त्वामधून जाणवत होता.