29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeव्हिडीओराजू शेट्टी सामान्यांसाठी लढणारा नेता, तरीही त्यांच्या विरोधात प्रस्थापितांकडून काड्या !

राजू शेट्टी सामान्यांसाठी लढणारा नेता, तरीही त्यांच्या विरोधात प्रस्थापितांकडून काड्या !

गरीब असो, धनदांडगा असो, मोठा राजकीय नेता असो, कारखानदार असो, चळवळीतील कार्यकर्ते असोत, विचारवंत असोत अथवा संशोधक असोत अशा सगळ्यांनाच राजू शेट्टी यांच्याबद्दल कुतूहल असतं.

राजू शेट्टी चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत (Raju Shetti trouble by Jayant Patil and Satej Patil). राजू शेट्टींच्या निवडणुकीकडे अख्खा महाराष्ट्र नेहमीच डोळे लावून पाहात असतो. गरीब असो, धनदांडगा असो, मोठा राजकीय नेता असो, कारखानदार असो, चळवळीतील कार्यकर्ते असोत, विचारवंत असोत अथवा संशोधक असोत अशा सगळ्यांनाच राजू शेट्टी यांच्याबद्दल कुतूहल असतं. कारण राजू शेट्टी हा लोकसभा निवडणूक लढविणारा महाराष्ट्रातील एकमेव खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचा नेता आहे. आपण देशभरातील विदारक चित्र पाहात आहोत. जनतेचे नाव घ्यायचे, आणि स्वतःच्या तुंबड्या भरायच्या. आपल्या पदाचा वापर करून अमाप पैसा, संपत्ती जमा करायची. आपल्या वरिष्ठ नेत्यांची हुजरेगिरी करायची. धर्मांधता, जातियवाद पसरवायचा असे घाणेरडे प्रकार देशभरात सुरू आहेत.

पण राजू शेट्टी यांच्याबद्दल खरंच अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे, असं हे व्यक्तीमत्व आहे. हा माणूस कुठल्याही कारखानदाराची, धनदांडग्यांची हुजरेगिरी करीत नाहीत. ते धर्मांधता, जातियतेचं विष पसरवत नाहीत. शेतकऱ्यांचा खराखुरा नेता अशीच राजू शेट्टी यांची प्रतिमा आहे.

महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच प्रस्थापित पक्षांना राजू शेट्टी अडचणीचे वाटतात. कारण भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो अथवा शिवसेना असो या पक्षातील प्रस्थापित बहुतांश नेते हे धनदांडगे आहेत. कुणाचा साखर कारखाना आहे, तर कुणाचा दूध व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीतूनच या नेत्यांचे साखर कारखाने व दूध व्यवसाय चालत असतो. राजू शेट्टी बात मात्र निराळी आहे.

राजू शेट्टी मात्र शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत असतात. ऊस असो, दूध असो, कांदा असो अथवा शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न असो… राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी सतत आंदोलनाच्या पावित्र्यात असतात. शेतकऱ्यांच्या ऊसाला दरवाढ मिळावी, दुधाचा चांगला भाव मिळावा म्हणून ते आंदालने करीत असतात. त्यामुळं कारखानदार असलेल्या राजकीय नेत्यांची पंचाईत होत असते. सत्ताधारी पक्षाला राजू शेट्टींच्या मागण्या मान्य करताना नाकीनऊ येते. शेतकऱ्यांचा राजू शेट्टींना दणकट पाठींबा असतो. त्यामुळे शेट्टी यांच्या आंदोलनाची धार नेहमीच उग्र असते. अशा आंदोलनातून राजू शेट्टी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला सहजपणे मिळवून देतात. त्यामुळे राजू शेट्टींसारखा माणूस जर लोकसभेत गेला तर शेतकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी आणखी तीव्रपणे पोहचू शकतो.

पण राजू शेट्टींना हरविण्याचे मनसुबे धनदांडग्या राजकीय नेत्यांनी २०१९ च्या निवडणुकीत यशस्वी केले होते. आताच्या निवडणुकीतही प्रस्थापित नेत्यांनी राजू शेट्टी यांचा पराभव करण्यासाठी फिल्डींग लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील व काँग्रेसचे सतेज पाटील यांनी राजू शेट्टींच्या विरोधात काड्या केल्याचे बोलले जात आहे. राजू शेट्टी यांच्यासमोर दोन शिवसेनेचे दोन धनदांडगे नेते आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील हे निवडणूक लढवित आहेत. तर भाजपप्रणीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून धैर्यशिल माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या दोन्ही शिवसेनेमध्ये लढत होईल, असा मेसेज लोकांमध्ये पेरला जात होता. पण तो तकलादू असल्याचे राजू शेट्टी यांनी दाखवून दिलंय. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला. यावेळी सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. एक लक्षात घ्या… राजू शेट्टी पैसे देवून कधीही गर्दी करीत नाहीत. उलट सामान्य जनताच राजू शेट्टी यांना पैसे देत असते. त्यामुळे राज्यभरात आणि अगदी हातकणंगले मतदारसंघात सुद्धा प्रस्थापित नेते खर्च करून लोकांची गर्दी जमवत असतानाचे चित्र दिसत आहे. पण राजू शेट्टींवर सामान्य जनतेचा जीव आहे. ही सामान्य जनता खिशातून खर्च करत आहे. खिशातून राजू शेट्टींना खर्चायला पैसा देत आहे. या पैशातून शेट्टी निवडणूक लढवत आहेत. मघाशी मी म्हटल्याप्रमाणे राजू शेट्टी हा खऱ्या अर्थाने सामान्य माणूस, शेतकरी व रंजला गांजलेल्या जनतेचा नेता आहे. असा मनुष्य लोकशाहीचे मंदीर असलेल्या लोकसभेत पोचला पाहीजे. हे पोचविण्याचे काम हातकणंगले मतदारसंघातील मतदार करतील का…. इतर मतदारसंघातील बराच मतदार विकला गेला आहे, तसा मतदार हातकणंगले मतदारसंघातून विकला गेला नाही, हे दाखविण्याची संधी हातकणंगले मतदारसंघातील जनतेला मिळाली आहे. याचं ते सोनं करतील अशी आशा करूयात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी