लय भारी टीम
मुंबई : राज्यात कालपासून वरुणराजाने चांगलीच बॅटिंग करायला सुरूवात केली. मुंबई, मुंबई उपनगर, कोकण आणि राज्यातील इतर भागांना मुसळधार पावसाने झोडपले असून काही ठिकाणी केवळ संततधार पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे, तर पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी पाण्याचे साम्राज्य
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर काल पाणी साचले होते, तर सायन पश्चिमेकडील रोड क्रमांक 6, अंधेरी सबवे, बांद्रा सायन मुख्यमार्ग, चेंबूर, सायन गांधी मार्केट अशा अनेक ठिकाणी सुद्धा पाणी साचले होते, मात्र पावसाने थोडा वेळ विश्रांती घेताच बऱ्याच ठिकाणचे पाणी ओसरले. दरम्यान शहरात पावसाची संततधार अजूनही सुरूच असून मुंबई आणि मुंबई उपनगरांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात NDRF टीम सज्ज
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर NDRF टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यात मुसळधारचा अंदाज
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागां मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर काही भागांत 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
कालपासून वरुणराजाचे जोरदार आगमन झाले आहे, शिवाय पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे कुठेही बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा…
‘ते’ वेळेत पोहोचले नाही… तर ‘ते’ रुसतात, असेही अनोखे प्रेम