राज्याच्या सत्ता समीकरणात गेल्या काही महिन्यांपासून सतत बदल होताना पाहायला मिळत आहे. जे पक्ष एकमेकांसोबत कधीही सोबत येणार नाहीत, अशी चिन्हे असताना आता नेमका कोण कोणासोबत हे देखील सांगता येणं कठीण होऊ बसले आहे. पण अशातच आता राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलताना पाहायला मिळणार आहे. यापुढे शिवसेनेला संभाजी ब्रिगेडची साथ मिळण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (Shiv Sena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांच्यात युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे आणि त्याचमुळे आज दोन्ही प्रादेशिक पक्ष एकत्र झाल्याचे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.
गेल्या ३० वर्षांपासून संभाजी ब्रिगेड हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. पण २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेड ने या संस्थेची पक्ष म्हणून देखील नोंदणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तसेच लवकरच या दोन्ही पक्षाकडून एकत्र मेळावे देखील घेणार येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड यांनी त्यांच्यासोबत युती करण्याबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशातून प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरु आहे, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लागवण्यात आला आहे. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असे मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. संविधान टिकवण्यासाठी ही युती झाल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या एकत्र येण्याने एक चांगले समीकरण तयार होणार आहे. आगामी काळात संभाजी ब्रिगेडने लोकसभा, विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. देशात विषमतावादी वातावरण तयार झाले आहे. ज्यामुळे देशाला आज क्रांतीची गरज आहे, असे मत मनोज आखरे यांनी व्यक्त केले.
हे सुद्धा वाचा
BMC Election 2022 : मनसेने महानगरपालिका निवडणुकीसाठी कसली कंबर
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी संपेनात, निवडणूक पत्रावरून होणार चौकशी
दरम्यान यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई देखील उपस्थित होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडला शिवसेनेसोबत यायचे होते. तसेच याबाबतची एक बैठक सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये झाल्याचे सुभाष देसाई यांच्याकडून सांगण्यात आले.