आज, सोमवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य सचिवांची चर्चा होणार आहे. कर्मचाऱ्यांचा संपाचा सहावा दिवस आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा पूर्णपणे कोलमडून पडली आहे. क्षेत्रीय स्तरावर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांत अडथळा येत आहे. अशा परिस्थितीत  राज्य सरकारी-निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने लक्षवेध सप्ताह पाळायचे ठरवले  आहे. यात सोमवारी राज्यातील सर्व जिल्ह्यातील कर्मचारी दुपारी 12 ते 12.30 या वेळेत  थाळीनाद करून सरकारचा धिक्कार करणार आहेत.  बुधवारी काळा दिवस पाळला जाणार आहे. सर्व कर्मचारी काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा घेऊन जाणार आहेत. शुक्रवारी कर्मचारी माझे कुटुंब माझी पेन्शनह्ण हे अभियान राबवणार आहेत. यामध्ये सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेध करतील.
जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 14 मार्चपासून संप पुकारला आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकारने जुन्या निवृत्तिवेतन योजनेबद्दल निर्णय घ्यावा, अशी कर्मचारी संघटनांची भूमिका होती. चर्चेतून तोडगा निघू शकलेला नाही. सरकारच्यावतीने मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी, संपात सहभागी झालेल्या इतर संघटनांचे कर्मचारी यांच्यात दोन बैठका झाल्या. यातून काहीच तोडगा निघाला नाही. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जोपर्यंत सरकार जुन्या निवृत्तिवेतन योजनेविषयी काही निर्णय घेत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना पुढील कार्यक्रम दिला आहे, असा इशारा राज्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वयक विश्वास काटकर यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे मुख्य  सचिवांसोबत बैठक आहे. या बैठकीत काय चर्चा होते यावर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • नवी पेन्शन योजना रद्द करावी
  • दीर्घ सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळावे
  • सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी
  • बिनशर्त अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करावी
  • सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे ठेवावे
  • नवीन शैक्षणिक धोरण संपुष्टात आणावे
  • आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लक्ष द्यावे

हे सुद्धा वाचा :

18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; सरकारी विभागांचे कामकाज ठप्प

 PHOTO: राज्यात लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक

अखेर पाच दिवसानंतर लाल वादळ शमलं..!